महाविकास आघाडी सरकारवर सतत निशाणा साधणाऱ्या भाजप या विरोधी पक्षाने ठाकरे सरकारच्या नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्यावरूनही त्यांना लक्ष केले आहे. काल, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान पाहण्यासाठी तीन दिवसिय दौऱ्यावर आले असताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दौर बंद करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच ठाकरे सरकार हे रडणारे सरकार आहे, ते काय अश्रू पुसणार, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
काय म्हणाले प्रवीण दरेकर
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करायला आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानीच्या मदतीबाबत बोलण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुत्सित टिप्पणी करुन आपले अपयश झाकण्यासाठी विषय दुसरीकडे नेत आहेत. या सरकारची ही स्ट्रॅटेजीच बनली असून चक्रीवादळ असो, कोरोना असो, अतिवृष्टी -गारपीट असो किंवा महापूर अशा सर्वच काळात कधी केंद्र सरकार आणि राज्य सरकार, कधी बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस तर कधी राज्यपाल आणि मुख्यमंत्री असे विविध वाद निर्माण करुन जनतेचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे दरेकर म्हणाले. दरम्यान, येत्या आठ दिवसात जर राज्य सरकारने मदत केली नाही तर भाजप शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष उभारेल, असा इशारा यावेळी प्रवीण दरेकर यांनी दिला.
पंढरपुरातील कुंभार घाटाची भिंत कोसळून निष्पाप लोकांचा बळी गेला होता. मयत गोपाळ लक्ष्मण अभंगराव यांच्याही घरी मी भेट दिली, त्यांचे सांत्वन केले, मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख मदत सरकारने दिली, ही मदत तोकडी आहे, अधिक मदत सरकारने द्यावी. @CMOMaharashtra pic.twitter.com/Xx8Ehnp0DQ
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) October 19, 2020
प्रवीण दरेकर सध्या पंढरपूर तालुक्यातील महापुरामुळे झालेल्या नुकसान पाहणीसाठी गावागावातील बांधावर भेटी देत आहेत. पूरग्रस्त पाहणी दौरा संपल्यावर दरेकर यांनी कुंभार घाट दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर आपले मनसे प्रदेश सरचिटणीस आणि जुने सहकारी दिलीपबापू धोत्रे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा –
राजकीय नेत्यांचा आज नुकसानग्रस्त भागांत पाहणी दौऱ्याचा तिसरा दिवस