पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला राजा समजू लागले आहेत. तर भाजपाच्या नेत्यांना सत्तेचा माज चढला आहे, हा सत्तेचा माज पुण्यातील कसबा पेठ व चिंचवडच्या पोटनिवडणुकीत (Kasba, Chinchwad bypolls) उतरवून भाजपाला त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
कसबा पेठ व चिंचवडच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची संयुक्त प्रचारसभा चिंचवड येथे पार पडली. या सभेला नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. नाना पटोले यांनी यावेळी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाचे मंत्री, नेते हे सातत्याने महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करत आहेत. भाजपाकडून केला जात असलेला हा अपमान महाराष्ट्राचा अपमान आहे, असे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला असा खोटा आरोप करून पंतप्रधान मोदी यांनी संसदेतच महाराष्ट्राची बदनामी केली. कोरोना काळात केंद्रात भाजपाचे सरकार झोपले होते तर, महाविकास आघाडीच्या सरकारनेच लोकांना आधार दिला, मदत पोहोचवली.
भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार परवा म्हणाले की, राहुल गांधी व नरेंद्र मोदींमध्ये खूप फरक आहे, त्यांची तुलना होऊ शकत नाही. त्यांचा समाचार घेत पटोले म्हणाले की, मुनगंटीवार खरे तेच बोलले. राहुल गांधी व मोदी यांची तुलना करताच येत नाही; कारण राहुल गांधी हे देश जोडण्याचे काम करत आहेत तर नरेंद्र मोदी देश तोडण्याचे काम करत आहेत, अशी टीका पटोले यांनी केली.
खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर 3 हजार 500 किमीची पदयात्रा काढली, जनतेच्या समस्या ऐकल्या, त्यांना धीर दिला, हिम्मत दिली. तर दुसरीकडे, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून फक्त देशाची संपत्ती एक-एक करून विकून देश चालवत आहेत. संविधान व्यवस्था मोडीत काढण्याचे काम करत आहेत. तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटत आहेत. छोटे व्यापारी, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत आहेत. म्हणून राहुल गांधी व नरेंद्र मोदी यांच्यात तुलना होऊच शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
केंद्रातील भाजपाचे सरकार सामान्य जनतेच्या घामाचा पैसा जीएसटीच्या माध्यमातून जमा करते व उद्योगपती मित्रांचे कर्ज फेडते, अशी टीका करून ते म्हणाले, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकतो, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देतो, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो अशी आश्वासने देऊन नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि नंतर तो निवडणुकीतला जुमला होता, असे म्हणून जनतेच्या फसवणूक केली.
पिंपरी चिंचवडच्या विकासात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे योगदान मोठे आहे. आघाडी सरकार असताना या भागात विकासाची कामे केली. मविआ सरकारनेही हा विकास पुढे सुरू ठेवला होता, पण तथाकथित महाशक्तीच्या मदतीने बेईमानी करून मविआचे सरकार पाडण्यात आले, असेही नाना पटोले म्हणाले.