आज रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा साजर झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला राजसदर येथे दुग्धाभिषेक करण्यात आला. या प्रसंगी संभाजीराजे छत्रपती यांनी शिवप्रेमींना संबोधीत करताना काही दिवसांत राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केले. काही दिवसापूर्वी राज्यसभा निवडणुकीसाठी संभाजीराजेंनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, शिवसेनेने दुसरा उमेदवार जाहीर केल्यामुळे त्यांची कोंडी झाली आणि त्यांना राज्यसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती. त्यांनी यावेळी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला.
सोय होत नसेल तर हा लढा येथूनच सुरू –
यावेळी मागील दोन वर्षात शिवराज्यभिषेक सोहळा साधेपणाने साजरा झाला. मी तेव्हा रायगडवर येऊ नका असे आवाहन केले होते. तुम्ही माझा शब्द ऐकलात . हा तुमचा छत्रपतींबद्दलचा विश्वास आहे, प्रेम आहे. येथे काय सोय आहे. मात्र, तरीही तुम्ही हजर राहता. माझा प्रश्न सरकारला आहे की शिवभक्तांसाठी तुम्ही काय केले? एसटी आम्हीच आणायची, पाणी आम्हीच आणायचे. जर सोय होत नसेल तर हा लढा येथूनच सुरू होईल. मग होऊन जाऊ दे, अशा शब्दात संभाजीराजेंनी राज्य सरकारला इशारा दिला.
महाराजांचे स्वराज्य आपल्याला पुन्हा एकदा उभे करायचे आहे –
राज सदर दिशा दाखवते, या राज सदरेवर मी राजकीय बोलणार नाही. राज्यात आरक्षण, शेतकरी, पाणी, असे अनेक प्रश्न आहे. हा संभाजी छत्रपती त्याबद्दल राज्यात लवकरच सर्वांना भेटायला येणार आहे. राज्याभिषेक सोहळ्यादिवशी शिवाजी महाराज छत्रपती झाले. देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन ज्या दिवशी राज्याभिषेक झाला तो असून महाराजांचा इतिहास पासून आपल्याला काय घ्यायचे हे ठरवायला हवे, असे संभाजी राजे छत्रपती म्हणाले.
पुढे त्यांनी महाराजांनी प्रस्थापितांऐवजी विस्थापितांना संधी दिली. शिवाजी महाराजांविरोधात अनेक शाही होत्या. त्यांना अडवण्यासाठी बाप-लेकात भांडणे लावली. शहाजीराजेंवर मोठा दबाव होता तेव्हा. घराण्यात फूट पाडण्यासाठी अनेकजण पुढे आले होते. शहाजींना आदिलशाहाने पत्र लिहिलं होते की शिवाजी महाराजांना थांबवा नाही तर आपल्यात शामिल करुन घ्या. मात्र, शहाजीराजेंनी शिवाजी महाराजांना स्वराज्य उभे करण्यासाठी रान उघडे करुन दिले. शहाजीराजेंच्या मदतीने शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया उभारला. हे सगळे करत असताना शिवाजी महाराजांनी कुठेही तडजोड केली नाही. या पिता-पुत्रांचे मला सांगायचे आहे. जी शिकवण मला दिली आहे ती तुम्हालाही दिली आहे. त्यामुळे वाकायचे नाही. पुरंदरचा तह अपमानकारक होता, त्यांना आग्र्याला जावे लागले. त्यांनी तो तह धुडकावून लावला. जिथे आपल्यावर बंधने घातली जातात, तिथे थांबायचे नसते. शिवाजी महाराजांनी संघर्ष परक्यांशी केलाच पण स्वकियांशीही केला. शिवाजी महाराजांचे स्वराज्य आपल्याला पुन्हा एकदा उभे करायचे आहे, अशा शब्दात संभाजीराजेंनी आपली दिशा स्पष्ट केली.