घरमहाराष्ट्रसांगलीत कृष्णा, कोल्हापुरात पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी; गावकऱ्यांचे स्थलांतर

सांगलीत कृष्णा, कोल्हापुरात पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी; गावकऱ्यांचे स्थलांतर

Subscribe

रत्नागिरी, रायगडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने महाड, चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूरमध्ये महापूर आल्याने हाहा:कार उडाला आहे. महाड, चिपळूण पाण्याखाली गेले असताना हजारो लोक आपल्या घरात अडकून पडले असताना कोल्हापूर आणि सांगली भागात देखील पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीने गुरूवारी रात्री धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पंचगंगा नदी काठच्या गावातील नागरिकांचे वाढत्या पावसामुळ स्थलांतरणाचे काम सुरू करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंचगंगा नदीची पाणी पातळी ४६ फूट एक इंचांवर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ११० हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९, तर धोका पातळी ४३ फूट असून दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी वेगाने वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोल्हापुरात पावसाचा जोर कायम असाच राहिल्यास पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही अचानकपणे वाढ झाली आहे. गुरुवारी रात्री ११ वाजता पाणीपातळी ३० फुटांवर गेल्याचे दिसत आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीजवळ पोहोचली असून सध्या आयर्विन पुलावर पाणी पातळी ३८ फुटांच्यावर गेली असून कृष्णेची ४० फूट इशारा पातळी तर ४५ फूट धोका पातळी असल्याचे सांगितले जात आहे. सांगलीतील सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरल्यामुळे १५ घरांमधील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्यात येत असलं तरी नागरिकांमध्ये पुराच्या वाढत्या पाण्याची भिती आहे. यासह कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात पावसाचा जोर अद्याप कायम असून अतिवृष्टीमुळे ताम्रपर्णी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कोवाड बाजार पेठेत पाणी शिरले असून व्यापारी चिंतेत असल्याची माहिती आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -