सांगलीः सध्या महाराष्ट्रात जे चाललंय ते अजिबात पटत नाही. शरद पवारांवर होणारी टीका दुर्दैवी आहे. कमरेखालेच वार शरद पवारांनी कधीच केले नाहीत. स्वार्थासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत. सांगलीत एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.
अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे विषय हे आपल्या अधिवेशनाच्या निमित्तानं होणार आहेत. त्यासंदर्भात मला अवगत करण्यात आलेलं आहे. चर्चा करा आणि जो काही सार निघेल त्यावेळी तुमच्या स्तरावर निर्णय घ्यायचा अधिकार असेल तेव्हा तुम्ही निर्णय घ्या. जिथे लोकप्रतिनिधी आणि सरकारची मदत लागेल, सरकारचं सहकार्य लागेल, शेवटी हे महाविकास आघाडीचं सरकार आपल्या सर्वांचं आहे. अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या माणसांचं आहे, असंही अजित पवारांनी सांगितलंय.
माझ्या जैन बांधवांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं दीर्घायुषी असणं, आपली आदर्श जीवन पद्धती आणि विचारांमुळे जैन समजा दीर्घायुषी आहे हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. हिंसेचा त्याग, अहिंसेचा अवलंब, वादांच्या पासून दूर, अत्यंत साधं शाकाहारी भोजन या जीवनपद्धतीमुळे देशात सर्वाधिक आयुष्यमान असलेला समाज म्हणून आपल्या जैन समाजाची ओळख आहे. जैन समाजाचं हे रहस्य जाणून इतर समाजातील बांधवांनी देखील दीर्घायुष्य होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असंही अजित पवारांनी अधोरेखित केलंय.
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगलीतील विकास कामांची यादी सांगत पत्रकारांशी संवाद साधला होता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोरोनामुळे जशा पद्धतीने निधी विकासकामाला ज्या पटीत मिळायला पाहिजे होता, त्या पटीत आम्ही देऊ शकलो नाही. त्याचं कारण आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे देशातील केंद्र सरकारला आणि राज्यांमधील राज्य सरकारांना प्राधान्य आरोग्य सुविधा देणं, कोरोनामधून त्या माणसाला बाहेर काढणं, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यांसारख्या बऱ्याच गोष्टींमध्ये प्राधान्य द्यावे लागले. शिवाय व्हॅक्सिन देणे, ऑक्सिजन प्लाण्ट उभे करणं, ऑक्सिजन कमी न पडू देणं, जम्बो हॉस्पिटल उभी करणं, इतर हॉस्पिटल्स आहेत, यामधील खासगी किंवा सरकारी असतील यामध्ये सर्व सोयी उपलब्ध करणं, या संदर्भातील सर्व आढावा मी काल घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.