भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी आम्हाला थांबवले, अन्यथा भाजपने पूर्ण दार उघडले, तर राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय कुणी उरणार नाही. असे का घडले?, कारण तुम्ही केवळ कुटुंबाचा विचार केला आणि आम्ही विकासाचा विचार केला,असा घणाघाती हल्ला केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसर्या टप्प्याच्या समारोपप्रसंगी सोलापूर येथे ते बोलत होते. दोन्ही काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा महाराष्ट्रात ७४ हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला. या घोटाळ्याचे स्मरण ठेवा, आज देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले, त्यांनी ८ हजार कोटी जलशिवारसाठी घेतले आणि २२ हजार गावांमध्ये पाणी आणले. मात्र भाजप सरकारने एका पैशाचा घोटाळा केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बनवण्याचे लॉलिपॉप दाखवले, पण देवेंद्र फडणवीस सरकारने शिवस्मारकाचे जलपूजन करून दाखवले, असे सांगत महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहे ज्यांनी सलग ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला, अशा शब्दांत शाह यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले.
शरद पवार महाजनादेश यात्रेचा हिशेब मागत आहेत. १५ वर्षे तुम्ही सत्तेत होता, तेव्हा तुम्ही राज्याला काय दिले? १३व्या वित्त आयोगात काँग्रेसने महाराष्ट्राला १ लाख १५ हजार कोटी रुपये दिले, मात्र केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले, तेव्हा केंद्राने महाराष्ट्राला २ लाख ८६ हजार कोटी रुपये दिले, आम्ही अडीच पटीने जास्त पैसे महाराष्ट्राला दिले. काँग्रेसने दिलेल्या पैशात भ्रष्टाचार झाला, भाजपने पैसे दिले, त्याचा विनियोग जनतेसाठी झाला, असे सांगत काश्मीरमधून ३७० कलम हटवले हे योग्य केले की नाही, याबाबत काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान शहा यांनी दिले.
या सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मेगाप्रवेश होण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र केवळ तिघांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश घेतला. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे माणचे आमदार जयकुमार गोरे, आणि उस्मानाबादचे आमदार राणाजगजितसिंग पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपने विरोधकांच्या पैलवानांना चारीमुंड्या चित केले आहे, म्हणून आमच्या यात्रेत पावसातही मैदान पुरत नाही आणि दोन्ही काँग्रेसच्या यात्रांमध्ये मंगलकार्यालयही भरत नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाणला. २००४-२०१४ पर्यंत इव्हीएमने निवडणुका इव्हीएमने झाल्या ,तेव्हा ईव्हीएमवर आक्षेप नव्हता, मात्र त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पराभव केल्यानंतर ईव्हीएम वाईट ठरू लागले. बारामतीत ईव्हीएम चांगले, मग सोलापुरात ईव्हीएम वाईट कसे ठरते? नापास झालेले दोन्ही काँग्रेसचे नेते ईव्हीएमवर खापर फोडत आहेत, असे सांगत महाराष्ट्र सर्व क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आला आहे, आता कोकणातील पाणी मराठवाड्यात वळवून मराठवाडा दुष्काळमुक्त करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.