घरमहाराष्ट्रशिखर बँक घोटाळ्यात माझे नाव आल्याने अजित अस्वस्थ होते

शिखर बँक घोटाळ्यात माझे नाव आल्याने अजित अस्वस्थ होते

Subscribe

शरद पवारांचा खुलासा, अजित मुलांना म्हणाले शेती करू, पवार कुटुंबियांत मतभेद नाहीत

मी कोणत्याही पदावर नसताना शिखर बँक घोटाळ्यात माझे नाव गोवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार अस्वस्थ झाले होते. त्या उद्विगनतेतून त्यांनी राजीनामा दिला असावा. मात्र राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी माझ्याशी कोणतीही चर्चा केली नाही किंवा कल्पनाही दिली नाही. मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. काही पटले नाहीतर त्याबाबत ठाम भूमिका घेण्याचा अजित पवार यांचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. राजीनामा देण्यापूर्वी अजित पवार यांनी मुलांशी चर्चा केली होती. राजीनाम्यानंतर अजितचा मुलगा पार्थ याच्याशी फोनवर बोलल्यानंतर राजीनाम्याचे कारण कळल्याचे म्हणत पवार कुटुंबियांत मतभेद नसल्याचे पवारांनी सांगितले.

आमच्या कुटुंबियांना धक्का बसेल अशी कोणतीही बातमी देऊ नका, अशी विनंतीही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. आपल्या कुटुंबीयांशी चर्चा करताना अजित पवार यांनी सांगितले होते की, सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या अडचणीत आल्यानंतर शिखर बँकेकडून त्यांना अर्थसहाय्य करण्यात आले. साखर कारखाने, सूत गिरण्या यांच्यावर अनेक शेतकरी कुटुंबे अवलंबून आहेत. ते बंद झाले तर शेतकरी वर्ग संकटात येतो. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हितासाठी राज्य सहकारी बँकेने काही निर्णय घेतले होते. या निर्णयांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीबाबत अजित पवार यांना वैयक्तिक कोणतीही भीती वाटत नाही. मात्र माझे नाव या घोटाळ्यात घेतल्यामुळे ते व्यथित झाले होते. त्यामुळेच राजीनामा दिला असल्याचे अजित पवार यांच्या कुटुंबियांनी सांगितले अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

- Advertisement -

राजकारण सोडून शेती-उद्योग करु – अजित पवार
आपल्या चिरंजीवाशी बोलताना अजित पवार म्हणाले की साहेबांनी इतके वर्षे लोकांसाठी काम करुनही जर त्यांना असे परिणाम पाहायला मिळत असतील तर यापुढे राजकारणात काम न केलेलेच बरे. राजकारणापेक्षा आपण शेती आणि उद्योगात लक्ष घालू, अशी भावना अजित पवार यांनी आपल्या चिरंजीवाजवळ व्यक्त केली असल्याचे पवार यांनी सांगितले.

आम्हा कुटुंबियांत मतभेद नाहीत
अजित पवारांचा राजीनामा आणि पवार कुटुंबिय कलह याचा कोणताही संबंध नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमवरून माझी आणि अजित पवार यांची परस्पर विरोधी भूमिका होती. मात्र दोन व्यक्तींमध्ये मतभेद असतात, ते नैसर्गिक असते, असे पवार म्हणाले. पवार कुटुंबियांत यत्किंचितही वाद नाहीत. आमच्या कुटुंबात, कुटुंब प्रमुखाचा निर्णय अंतिम मानला जातो, त्याचा सन्मान इतर सदस्य राखतात. आधी माझ्या मोठ्या बंधुना तो मान होता. त्यानंतर माझ्या शब्दाचा कुटुंबात आदर केला जातो, असेही पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -