मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी मातोश्रीला वाहतूक सेनेकडून तब्बल ११ हजार निष्ठेची प्रतिज्ञापत्रे सोपविण्यात आली. बंडखोर गटाला न्यायालयात शह देण्यासाठी शिवसेनेकडून सध्या प्रतिज्ञापत्रे जमा केली जात आहेत. यावेळी आपण राजकीय खड्डे पार करू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
आज तुम्ही ११ हजार प्रतिज्ञापत्रे सोपविली. ही तर केवळ सुरुवात आहे. मला एवढी प्रतिज्ञापत्रे पाहिजे की तिकडे पुरावे सादर करण्यासाठी तुमच्या वाहतूक सेनेची मदत घ्यावी लागेल. राज्यभरातील ट्रक, टेम्पो कमी पडतील एवढी प्रतिज्ञापत्रे मला मिळत असून तेवढी आपली सदस्य संख्या वाढत चालली आहे, असे ठाकरे म्हणाले.
प्रतिज्ञापत्रे सादर करण्यामागे आपली सर्वांची मेहनत आहे. आपल्याकडे कुणी भाडोत्री माणसे नाहीत. आहे ते सर्व भगव्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे आहेत. बाकी जे काही बोलायचे आहे, ते मी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असल्याचे स्पष्ट केले.
वाहतूक सेना म्हटल्यानंतर तुम्हाला रस्त्यांवरच्या खड्ड्यांची सवय असतेच. ते खड्डे तुम्ही पारही करता, पण येथे जे राजकीय खड्डे पडलेले आहेत, त्याला आपण सर्वजण मिळून बघूच, असे ठाकरे म्हणाले. यावेळी उपस्थित वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांनी आम्ही सगळे आपल्यासोबतच आहोत, अशी घोषणा केली. त्यावर ही जिद्द महत्त्वाची आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले.