घरताज्या घडामोडीमराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार, शिवसेना नेते संजय राऊत यांचा विश्वास

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार, शिवसेना नेते संजय राऊत यांचा विश्वास

Subscribe

मराठा समाजाच्या नेत्यांवर आंदोलनाची वेळ येऊ नये अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.

राजकारणात टाळा आणि चावी दोन्ही महत्त्वाच्या असतात. ज्याच्याकडे टाळे आहे, तो कुठल्याही गोष्टीला टाळा लावू शकतो आणि ज्याच्याकडे चावी आहे तो कुठलेही टाळे उघडू शकतो. आमच्याकडे चावी आहे. त्या चावीने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू,’ असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राऊतांवर टीका केली होती. संजय राऊत हे चावी दिल्याशिवाय बोलत नाहीत, असा टोला दानवे यांनी लगावला होता. त्या टीकेला राऊत यांनी आज उत्तर दिले.

‘राजकारणात चावी द्यावीच लागते. मग ते पंतप्रधान असोत, मुख्यमंत्री असोत की माजी मुख्यमंत्री! पक्षाचे आदेश असतात. सूचना असतात. त्यानुसार भूमिका मांडावी लागते. आमच्याकडे चावी होती म्हणूनच आम्ही दीड वर्षांपूर्वी भाजपच्या सत्तेला टाळे लावले आणि आमच्या सत्तेचे टाळे उघडले,’ असा चिमटाही राऊत यांनी काढला. रावसाहेब दानवे हे माझे मित्र आहेत. ते बऱ्याचदा विनोद करत असतात. त्यांचे ग्रामीण नेतृत्व आहे. त्यांच्या शैलीचे मी नेहमीच कौतुक केले आहे, असेही राऊत म्हणाले.

- Advertisement -

कोल्हापूरमध्ये सुरू झालेल्या मराठा समाजाच्या मूक आंदोलनावरही त्यांनी भाष्य केले. कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची भूमी आहे. तिथून सुरू झालेल्या आंदोलनाला राज्यातील सर्वच घटकांचा पाठिंबा आणि सहानुभूती आहे. या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना साकडे घातले आहे. मराठा समाजाच्या नेत्यांवर आंदोलनाची वेळ येऊ नये अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. त्यामुळे या प्रश्नावर केंद्र सरकार नक्कीच तोडगा काढेल, असेही संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -