घरताज्या घडामोडीकांदिवलीतील हिरानंदानी सोसायटीत झालेल्या 'त्या' बोगस लसीकरणाची चौकशी होणार; ४८ तासांत अहवाल

कांदिवलीतील हिरानंदानी सोसायटीत झालेल्या ‘त्या’ बोगस लसीकरणाची चौकशी होणार; ४८ तासांत अहवाल

Subscribe

लस घेणाऱ्या रहिवाशांनी लसीकरणाबाबत संशय व्यक्त केला. त्यानंतर काही लोकांनी मिळून थेट कांदिवली पोलीस ठाणे गाठून बोगस लसीकरणाबाबत लेखी तक्रार दाखल केली.

कांदिवलीत हिरानंदानी सोसायटीमध्ये खासगी लसीकरण प्रक्रियेअंतर्गत बोगस लसीकरण झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई महापालिकेने त्याची गंभीर दखल घेतली आहे. तसेच या प्रकरणी पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार यांची एक चौकशी समिती नेमली आहे. ही समिती ४८ तासांतच चौकशी अहवाल सादर करणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईमध्ये १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले. आधी पालिका, सरकारी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर लसीचा डोस देण्यात येत होता. नंतर खासगी लसीकरण केंद्रांवरही लसीकरण करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता खासगी रुग्णालयांमार्फत खासगी सोसायटीमध्येही लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

कांदिवली येथील हिरानंदानी सोसायटीमध्ये ३० मे रोजी ३९० लोकांचे बोगस लसीकरण झाल्याचे समोर आले आहे. लसीकरणानंतर चार तास उलटूनही नागरिकांना अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले नाही. तसेच लस घेतल्यानंतर रहिवाशांना ताप, अंग दुखी यासारखे शारीरिक त्रास जाणवले नाहीत. त्यामुळेच लस घेणाऱ्या रहिवाशांनी लसीकरणाबाबत संशय व्यक्त केला. त्यानंतर काही लोकांनी मिळून थेट कांदिवली पोलीस ठाणे गाठून बोगस लसीकरणाबाबत लेखी तक्रार दाखल केली.

- Advertisement -

या गंभीर घटनाप्रकारामुळे भाजपचे आमदार योगेश सागर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या बोगस लसीकरण प्रकरणाची मुंबई पोलिसांनी सखोल चौकशी न केल्यास सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे. या बोगस लसीकरणाप्रकरणी पालिकेने उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्यामार्फत चौकशी समिती नेमली असून पुढील ४८ तासांत चौकशी अहवाल सादर करण्यात येणार आहे.

खासगी केंद्रांवर राज्य सरकार आणि महापालिकेने अंकुश ठेवणे गरजेचे असल्याचे म्हणण्यात येत होते. मात्र, खासगी रुग्णालयांना मोकळीक देण्यात आल्याने ते काय करतात याची माहिती पालिका आणि राज्य सरकारकडे नाही. खासगी लसीकरण केंद्र काय करतात याची माहिती महापालिका आणि राज्य सरकारला द्यायलाच पाहिजे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -