ठाणेः कळवा-मुंब्रा खाडीवरील उड्डाणपुलाच्या उद्घाटनावेळी श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार वाकयुद्ध पाहायला मिळाले. खासदार श्रीकांत शिंदे हा मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. त्याच्याशी बोलताना सांभाळून बोललं पाहिजे, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय. यंत्रणा त्यांच्याकडे आहे, तुम्ही किती दिवस तुरुंगात राहाल हे तुम्हालाही समजणार नाही, अशा धमक्या आता मिळू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांना घाबरलं पाहिजे, अशीही उपरोधिक टीका त्यांनी केली आहे.
सगळ्या मंत्र्यांची चौकशी करू, अशी धमकीही आताच मिळाली आहे. तुम्हाला जामीन कोण देतंय ते बघू, अशा धमक्याही आता मिळणार असतील तर गाव सोडून गेलेल बरे, असंही आव्हाड म्हणालेत. कळवा खाडी पुलासाठी मी पाच वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आणि पाठपुरावा केला होता. हा पूल ज्या ठिकाणी उतरतो, तेथून काही अंतरावर असलेल्या रेल्वेपुलाखालील बोगद्यांमुळे त्या परिसरात वाहतूक कोंडी होईल, त्यामुळे येथील कोंडी सोडवण्याची मागणी आव्हाडांकडून मुख्यमंत्र्यांसमोर करताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी याबाबत महापालिका प्रशासन सक्षम असल्याचे सांगत ते या प्रश्नावर नक्कीच मार्ग काढतील, असे स्पष्ट केले.
त्यावेळी महाविकास आघाडीच्या काळात पीडब्ल्यूडी, एमएमआरडीए आदी विभाग शिंदेंकडेच होते, असे आव्हाड यांनी सांगितले. त्यावर ठाणे महानगरपालिका आणि सध्याचे सरकारला या प्रश्नांबद्दल माहिती असून, या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सरकार म्हणून सक्षम आहोत, असे उत्तर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आव्हाडांना दिले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत शाब्दिक वाद शांत केला.
हेही वाचाः खासदार अनिल देसाई यांची स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदी निवड