नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज, रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 104वा भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी, नेमबाजीत भारताच्या विजयाचा झेंडा फडकावणारी महाराष्ट्राची अभिज्ञा पाटील हिच्याशी संवाद साधला. यावेळी अभिज्ञाने आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली.
You will enjoy hearing this conversation with 4 bright athletes who excelled in the World University Games. #MannKiBaat pic.twitter.com/Up07qeNTjo
— Narendra Modi (@narendramodi) August 27, 2023
अभिज्ञाने आपली ओळख करून देताना सांगितले की, नेमबाजीत 25 मीटर पिस्तुल आणि 10 मीटर एअर पिस्तुल दोन्ही क्रीडाप्रकारात मी भाग घेत असते. माझे आईवडील शाळेत शिक्षक आहेत. मी 2015मध्ये नेमबाजीची सुरूवात केली आणि तेव्हा इतक्या सुविधा कोल्हापुरात मिळत नव्हत्या. बसने वडगावहून कोल्हापूरला जाण्यासाठी दीड तास लागत असे. दीड तास परत येण्यासाठी आणि सराव चार तासाचा. माझी शाळाही बुडत होती. नंतर ममी-पप्पा मला म्हणाले की, आम्ही तुला शनिवारी-रविवारी शूटिंगसाठी घेऊन जात जाऊ. उरलेल्या वेळात दुसरे खेळ करत जा. ममी-पप्पा यांना खेळात खूप रस होता. पण ते त्यावेळी काही करू शकले नाहीत. कारण आर्थिक पाठिंबाही त्यावेळी तितकासा नव्हता. शिवाय, तितकी माहितीही नव्हती, असे तिने सांगितले.
हेही वाचा – अभी तो सूरज उगा है…, कविता वाचन करत पंतप्रधान मोदींकडून मिशन चांद्रयान-3चे कौतुक
माझ्या आईचे स्वप्न होते की, मी देशाच प्रतिनिधित्व केले पाहिजे आणि देशासाठी पदकेही जिंकली पाहिजेत. म्हणूनच, मी त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहानपणापासून खेळातही खूप रुची घेत असे. नंतर मी तायक्वांदो शिकले. मी ब्लॅकबेल्ट आहे. मुष्टीयुद्ध आणि ज्युडो, तलवारबाजी, थाळीफेक अशा खेळांतही भाग घेऊन 2015मध्ये नेमबाजी शिकले. दोन-तीन वर्षे मी खूप संघर्ष केला आणि मलेशियात माझी निवड झाली; मला तिथे कांस्य पदक मिळाले. तिथून मला खूप प्रोत्साहन मिळाले. माझ्या शाळेने माझ्यासाठी एक शूटिंग रेंज बनवली. नंतर शाळेने मला प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठवले. मी आता गगन नारंग प्रतिष्ठानमध्ये आहे. गगन सरांनी मला चांगला पाठिंबा दिला असल्याचे ती म्हणाली.
तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी चीनमध्ये विश्वविद्यापीठ स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत भारताची कामगिरी सर्वोत्कृष्ट राहिली. आपल्या खेळाडूंनी एकूण 26 पदके जिंकली, ज्यात 11 सुवर्ण पदके होती. 1959पासून आतापर्यंत जितक्या विद्यापीठ स्पर्धा झाल्या आहेत, त्यात आतापर्यंत जिंकलेल्या सर्व पदकांची संख्या मोजली तर ती 18च होते. इतक्या दशकांत केवळ 18 पदके तर आता यावेळी देशाने 26 पदके जिंकली आहेत, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.
हेही वाचा – भाजपाने नुसता खिसा साफ केला तरी…, संजय राऊत यांचा हल्लाबोल
तिरंदाजी, नेमबाजी मध्ये आपले खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, आता खेळाबद्दलची भावना पूर्वीसारखी राहिलेली नाही. पूर्वी मुले खेळायला जायची तर घरातील मंडळी त्यांना अडवायची. पण आता काळ खूप बदलला आहे आणि खेळाडू जे यश मिळवून आणत आहात, त्यामुळे सर्व परिवारांना प्रोत्साहन मिळत आहे. प्रत्येक खेळात आज आपली मुले कुठे कुठे जातात, देशासाठी काही न काही करून येतात. या बातम्यांविषयी चर्चा होत राहते. भारताने क्रीडा क्षेत्रात खूप चमकले पाहिजे. हॉकी, फुटबॉल, कबड्डी, खो-खो हे खेळ आपल्या मातीशी निगडीत आहेत. त्यामुळे त्यात तर आपण कधीही मागे राहता कामा नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.