परदेशात शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीचा डोस घेण्यात अडथळे येत असल्यामुळे अनेकांचा प्रवास लांबत चालला होता. कोरोना लसींचा तुटवडा आणि लसीच्या डोसमधील ८४ दिवसांच्या आंतरामुळे या विद्यार्थ्यांना तसेच परदेशात नोकरीला जाणाऱ्या तरुणांना अडथळे येत होते. या तरुणांचे लसीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी मुंबई ग्राहक पंचायत तसेच लोकप्रतिनिधींनी राज्य सरकार आणि महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला होता. परंतु तरुणांना कोरोना लसीचा दुसरा डोस २८ दिवसांत देण्याच्या प्रक्रियेला केंद्र सरकारने परवानी दिली असल्यामुळे या तरुणांना आता दिलासा मिळणार आहे.
परदेशात शिकण्यासाठी जाणाऱ्या आणि नोकरीला जाणाऱ्या तरुणांच्या लसीकरणातही भोंगळ कारभार समोर आला होता तर लसींचा साठा वेळेवर न उपलब्ध झाल्यामुळे लसीकरण करण्यातही अडथळा येत होता. लसीचा पहिला डोस दिल्यानंतर ८४ दिवसांच्या अटीमुळे कित्येक विद्यार्थ्यांचा प्रवास लांबणीवर जात होता. यामुळे या विद्यार्थ्यांचे आणि नोकरीला जाणाऱ्या तरुणांची तारांबळ उडत होती. यामुळे खासदार आणि लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारला पत्र लिहून विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ८४ दिवसांची अट शिथिल करण्यात यावी अशी मागणी केली होती.
मुंबई महानगरपालिका, खासदार यांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्राची अखेर केंद्र सरकारने दखल घेतली आहे. केंद्र सरकारने परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नोकरीला जाणाऱ्या तरुणांसाठी लसीकरणाची नवी नियमावली सादर केली आहे. यामध्ये या विद्यार्थ्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस २८ दिवसांच्या अंतरावर देण्यास सांगितले आहे. तर या विद्यार्थ्यांचे लसीकरणाची सर्टिफिकेट थेट पासपोर्टशी लिंक करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी स्पर्धत, नोकरीला जाणारे तरुण,खेळाडू यांचा समावेश करण्यात आला आहे.
या तरुणांना कागदपत्रे तपासून,ओळपत्र, पासपोर्ट, नियुक्ती पत्रासारखे कागदपत्रांची छाणनी करुन कोरोना लसीचा डोस देण्याची विनंती केली आहे. तसेच तरुणांना कोव्हिशील्ड लसीचा डोस देण्यात येणार आहे. ही योजना ३१ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाला याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.