मुंबई – संजय राऊत यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाविषयीची अनभिज्ञता आणि सुषमा अंधारे यांनी देवी देवतांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात भाजपाने आज माफी मांगो आंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र, या आंदोलनात संजय राऊत आणि सुषमा अंधारे बाजूला राहिले असून पाकिस्तानच्या भुत्तोंविरोधातच भाजपाने आंदोलन छेडले.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून देशभरात भुत्तोंचा निषेध करण्यात येत आहे. त्याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही भुत्तोंविरोधात भाजपा आक्रमक झाली. संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात हल्लाबोल करण्यासाठी आयोजित केलेल्या आंदोलनात भाजपाने भुत्तोंचाच अधिक विरोध केल्याचं पाहायला मिळालं. माफी मांगो आंदोलनाची सुरुवात संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात झाली खरी पण उत्तरार्धात भुत्तोंविरोधातच आंदोलन रंगलं. त्यामुळे ऐनवेळी भुत्तोंचा विषय आला कुठून असा प्रश्न उपस्थित इतर आंदोलक कार्यकर्त्यांना पडला.
हेही वाचा – अंधारे-राऊतांच्या माफीवर भाजपा ठाम, आंदोलन सुरूच ठेवण्याचा प्रसाद लाड यांचा इशारा
केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात बिलावल भुत्तो यांच्याविरोधात भाजपाने आंदोलन छेडले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत पुण्यातील अलका चौकात माहिती दिली. भुत्तोंचा निषेध करण्याकरता राज्यभरात १२०० ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले. तसेच, पाकिस्तान हाय हायच्या घोषणा देत बिलावल भुत्तो यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भारतातील सर्व जनतेच्या भावना संतप्त झाल्या असून त्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. पुणे येथे भाजपा कार्यकर्त्याच्या निषेध आंदोलनात सहभागी झालो. #ShameOnPakistan pic.twitter.com/aRdtwLWTHx
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 17, 2022
बिलावल भुत्तो काय म्हणाले?
ओसामा बिन लादेन मेला आहे, हे मी भारताला सांगू इच्छितो, पण गुजरातचा कसाई जिवंत आहे आणि तो भारताचा पंतप्रधान आहे. मोदी पंतप्रधान होईपर्यंत त्यांच्यावर अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परराष्ट्रमंत्री आहेत, असं बिलावल भुत्तो यांनी म्हटलं होतं.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
संपूर्ण जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उच्च स्थान मिळाल्याने पाकिस्तान बावचाळला आहे. पाकिस्तानला भारतात येऊन दहशतवादी कारवाया करता येत नाहीत. आशिया खंडातील देश भारताच्या बाजूने उभे राहिले आहेत. त्यामुळे पाकिस्तानकडून अशी वक्तव्ये येत आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
आमदार प्रसाद लाड काय म्हणाले?
आमच्या देशाचे पंतप्रधान फक्त देशाचे पंतप्रधान नाहीत तर ते जगाचे मोठे नेते आहेत. पंतप्रधानाचा अपमान केल्यास त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. बिलावल भुत्तो नावाचा डुक्कर आमच्या पंतप्रधानांबद्दल होतो, हे कदापि सहन केलं जाणार नाही. ज्या देशाकडे खायला अन्न नाही, राहायला निवारा नाही, त्या देशाच्या मंत्र्याने आमच्या पंतप्रधानावर बोलण्याचा अधिकार नाही, असं प्रसाद लाड म्हणाले.
त्याचप्रमाणे पाकिस्तानचा विदेशमंत्री बिलावल भुट्टो ने पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी यांच्याबद्दल केलेल्या गरळ ओकीचा देखील यावेळी निषेध केला.#ShameOnPakistaniMedia pic.twitter.com/SwhRiIEXiI
— Prasad Lad (@PrasadLadInd) December 17, 2022