२०१४ नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखा अग्रेसिव्ह प्रचार करणारा नेता मिळाला. त्यांच्या प्रचारामुळे आणि आशेमुळे लोकं वाहत गेले. त्यामुळे अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव झाला. मोदींनी सोलापूरातून सैन्यांसाठी कपडे घेतले जातील असं सांगितलं होतं. मात्र, एकही रूपयाचा कपडा घेतला नाही. त्यांच्या खोट्या प्रचाराला लोक भुलले. मात्र, तरूणांच्या हाती नेतृत्व देण्यामध्ये आमची गफलत झाली, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
तरूणांच्या हाती नेतृत्व देण्यामध्ये आमची गफलत झाली
सुशीलकुमार शिंदे यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी ते म्हणाले की, तरूणांना सगळं नेतृत्व द्यायचं आणि बदल घडवून आणायला सांगायचे. त्याच्यामध्ये थोडीशी गफलत झाल्यासारखी मला वाटते. परंतु मी पक्षावर थेट टीका करू शकत नाही. कारण ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत काँग्रेस पक्षाला बऱ्याच वेळा आपले निर्णय घ्यावे लागतात. आम्ही १० वर्षांची सत्ता भोगल्याने अॅक्टिव्ह आहोत. त्यानंतर संघटना बांधण्याचं काम जे व्हायला पाहीजे होतं ते झालं नाही. त्यामुळे आम्हाला थोडसं मागं बघावं लागतंय, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर देखील भाष्य
एकट्या राहुल गांधींना दोष देणं शक्य नाहीये. पक्षात खळखळतं पाणी असलं पाहीजे. लोकांना बदल हवा होता. यावेळी त्यांनी पंजाबमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर देखील भाष्य केलं आहे. नवज्योतसिंग सिद्धू हे राजकीय माणूस नाहीयेत. तर खेळात जसे प्रयत्न केले त्यांनी तसेच प्रयत्न केलेत. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी जमवून घेतले नाही, असं शिंदे म्हणाले.
सध्या जात, धर्मावर राजकारण सुरू असून हे जास्त काळ चालणार नाही. सगळं बदलेल आणि लोक भाजपचा तिरस्कार करतील. देशाची आर्थिक स्थिती, उद्योग धंदे कमी होत आहेत. केवळ आकडे फुगवून चालणार नाहीत, असं शिंदे म्हणाले.
हेही वाचा : पालिका निवडणुकीच्या तोंडावर केंद्राकडून बेस्टला इलेक्ट्रिक बससाठी २६४ कोटी मंजूर