खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांनी आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. अमोल कीर्तिकरांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी ‘मला 100 दिवसानंतर तरुंगातून बाहेर आल्यानंतर जितका आनंद झाला नव्हता, तितका आनंद आज मला अमोल भेटायला आल्यानंतर झाला आहे’, असे वक्तव्य केले. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी वक्तव्य केले. तसेच, अमोल कीर्तिकर यांनही आपण कायम ठाकरे गटासोबत राहणार असल्याचे सांगितले. (Thackeray Group MP Sanjay Raut and Amol Kirtikar talk on gajanan kirtikar)
खासदार गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणले की, “अमोल कीर्तिकर हे आदित्य ठाकरे यांच्या संपूर्ण शिवसेनेच्या प्रवासात सोबत राहिलेले कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेबरोबरच आहेत.”
“गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयामध्ये ते सहभागी नाही. गजानन कीर्तिकर हे मुळ शिवसेनेबरोबरच आहेत, म्हणजेच उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत. ही मुळ पक्ष संघटना आहे. त्यांच्यासोबत अमोल कीर्तिकर राहिले याचा आम्हाला आनंद आहे. 100 दिवसानंतर तरुंगातून बाहेर आल्यानंतर जितका मला आनंद झाला नव्हता, तितका आनंद आज मला अमोल भेटायला आल्यानंतर झाला आहे. अमोल यांनी त्यांच्या वडिलांनी समजवण्याचा प्रयत्न केला”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
“यापुढे अमोल कीर्तिकर यांच्यासारख्या तरुणपिढीकडून शिवसेना पुढे जात आहे. आदित्य ठाकरे दौरे करत आहेत. उद्धव ठाकरेही सर्वत्र दौरे करत आहेत. सध्या महाराष्ट्राचे राजकारण इतके अस्थिर झाले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसार, मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे”, असेही राऊत यांनी म्हटले.
महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या प्रकल्पांवरही राऊतांनी भाष्य केले. “महाराष्ट्रातून एकामागोमाग एक प्रकल्प बाहेर जात आहेत. यावर कोणीच बोलत नाही. एकमेकांवरती चिखलफेक करण्यापेक्षा हे प्रकल्प का महाराष्ट्राबाहेर जात आहेत. कोण खेचतंय, कोण ओरबडतंय याच्यावर महाराष्ट्र म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून निर्णय घेणे गरजेचे आहे. राजकारण करण्यासाठी बराच कालावधी अजून शिल्लक आहे. पण महाराष्ट्र खचला आणि कमजोर झाला तर, आपण राजकारण करायला उरणार नाही, याचे भान आजच्या राज्यकर्त्यांनी आणि विरोधकांनी ठेवले पाहिजे. महाराष्ट्रचे नुकसान होत असताना, एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा महाराष्ट्राला भगधाड पाडण्याचा प्रयत्न होतोय, हे कसे रोखता येईल. तसेच, महाराष्ट्र आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्या कमजोर करून महाराष्ट्राला देशाच्या नकाशावरून नष्ट करण्याचे पडद्यामागे जे प्रयत्न सुरू आहेत, ते रोखण्यासाठी सध्या काही काळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे बंद केले पाहिजे. शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधपक्षातील प्रमुख लोकांशी संवाद साधून यासंदर्भात बैठक घेण्याची गरज आहे”, असे त्यांनी म्हटले.
या भेटीनंतर अमोल कीर्तिकर यांनीही माध्यमांशी संवाद साधला. “मी आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. यापुढेही त्यांच्यासोबतच काम करत राहीन. बऱ्याचा कालावधीनंतर संजय राऊत यांची भेट घेतली. गजानन कीर्तिकर यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. माझा निर्णय त्यानाही सांगितला. तसेच, शिवसेना वाढवण्यासाठी माझ्यावर जी काही जबाबदारी पडेल ती मी योग्यरित्या पार पाडणार आहे”, असे अमोल कीर्तिकर यांनी म्हटले.
हेही वाचा – ‘मला पुरणपोळी आवडत नाही’; चिमुरड्याच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचे मिश्कील उत्तर