मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूरग्रस्त सातारा जिल्ह्याची पाहणी करणार होते. मात्र, खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोयनानगर परिसरातून माघारी फिरलं. सातारा आणि कोयनानगर परिसरात जोरदार पाऊस आणि खराब हवामान यामुळे कोयना नगरातील हेलिपॅडवर लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे हे हेलिकॉप्टर पुणे विमानतळाकडे माघारी फिरलं. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री हे मातोश्रीवर पोहोचले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी १०.४५ वाजता पुण्याहून कोयनानगरकडे हेलिकॉप्टरने रवाना झाले. दुर्घटनाग्रस्त भागांची हवाई पाहणी करून मुख्यमंत्र्यांचे ११.३० वाजता कोयनानगर हेलिपॅडवर लँडिंग होणार होतं. नंतर ११.४० वाजता ते कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस भेट देतील व पूरग्रस्तांची विचारपूस करणार होते. तर, दुपारी १२.१५ वाजता कोयनानगर येथे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेणार होते. मा६, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचं लँडिंग होऊ शकलं नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर पुण्यात परतलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २६ जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार होते. तसंच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधणार होते. सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात भूस्खलन झाले असून मौजे आंबेघर आणि मौजे मिरगाव येथे दरड कोसळून दुर्घटना झाल्या आहेत.