एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे दर महिन्याच्या ७ तारखेला वेतन दिले जाते. मात्र या महिन्यातील वेतन ७ तारखेला न झाल्याने एसटीच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी वेतनाबाबत विचारणा केली आहे. तसेच महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेने एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. यासंबंधीचे वृत्त आपलं महानगरने दिले होते. मात्र आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्वतः लक्ष घालून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सोडवला आहे. आज सायंकाळीपर्यंत शासनाकडून सवलतीमधील शिल्लक असलेले ३०० कोटी रूपये एसटी महामंडळाला देण्यात येतील, अशी माहिती मंत्री अनिल परब यांनी दैनिक आपलं महानगरला दिली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांच्या प्रवासासाठी अहोरात्र काम करत आहे. अशा परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप महामंडळावर होत आहे. याचा एसटी कामगार संघंटनांनी निषेध केला आहे. एसटीतील अधिकाऱ्यांचे वेतन देण्यात आले असतानाच कर्मचाऱ्यांनासुद्धा वेतन देणे तेवढेच गरजेचे होते. मात्र, मंगळवारी वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. इतकेच नव्हे तर ज्या चालक, वाहक, यांत्रिकी आणि अन्य कर्मचारी यांच्या मेहनतीमुळे एसटी सुरू आहे. त्यांनाच अद्याप वेतन मिळालेले नाही. हा भेदभाव असून वेतन मिळण्यास विलंब होण्यास कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून करण्यात आली होती.
वेतनाला होऊ शकतो उशीर ?
राज्य शासनाकडे सवलतीचे शिल्लक असलेले ३०० कोटी रूपये आज मिळणार आहेत. मात्र पैसे मिळाले तरी वेतन जमा करण्याच्या प्रक्रियेला एक किंवा दोन दिवसाचा कालावधी लागतो. त्यात शुक्रवारी गुड फ्रायडेची सार्वजनिक सुट्टी आणि शनिवार सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस काम असल्याने बँकांवर अधिकचा कामाचा ताण पडू शकतो. त्यानंतर रविवारी सुट्टी आल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन शनिवारी किंवा सोमवारी बँक खात्यात जाम होण्याची शक्यता आहे.