मुंबई – लहान मुलांना पळवून घेऊन जात असल्याचे अनेक संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशा मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. मात्र, याच अफवेचा गैरफायदा घेत एका चिमुरड्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला. मात्र हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर या मुलाने स्वतःची चूक कबूल केली.
हेही वाचा – बीआयटी चाळीतील रहिवाशांना ५०० चौ.फुटांचे घरे देण्याची शिवसेनेची मागणी
संबंधित मुलगा अवघ्या ११ वर्षांचा असून तो घाटकोपरच्या अशोकनगर परिसरात राहतो. त्याला शाळेत कमी गुण पडले होते. त्यामुळे घरी काय सांगायचं हा प्रश्न त्याच्यासमोर होता. घरच्यांच्या ओरड्यापासून आणि शाळेत जाण्यापासून वाचावं याकरता त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. मुलांचं अपहरण करणारी टोळी मुंबईत शिरली असल्याची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचली. तसंच, मुंबईच्या रस्त्यांवरून मुलांचं अपहरण होत असल्याचंही त्याला समजलं. यावरून त्याने स्वतःचं दप्तर बाजूच्या घरात ठेवलं. तेथून ते बाहेर गेला. आणि पुन्हा घरी येताना कपडे आणि केस विस्कटून आला. त्याची ही अवस्था पाहून त्याच्या आईवडिलांनी याबद्दल विचारलं तेव्हा आपलं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा बनाव त्याने रचला. ही गंभीर बाब लक्षात घेत त्याच्या आईवडिलांनी तत्काळ घाटकोपर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनीही त्याची कसून चौकशी केली.
हेही वाचा – मुलाच्या सुरक्षेसाठी आईचा भन्नाट जुगाड; व्हिडीओ शेअर करत हर्ष गोएंकांनीही केलं कौतुक
शाळेत जात असताना दोघांनी चालू रिक्षात मला ओढण्याचा प्रयत्न केला. माझं तोंड दाबलं. मात्र, मी रिक्षातून उडी मारली आणि पळून आलो. परंतु माझं दप्तर ते घेऊन गेले, अशी माहिती या चिमुरड्याने पोलिसांनी दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासले. स्थानिकांकडे चौकशी केली. मात्र, असा प्रकार घडलाच नसल्यांचं समोर आलं. त्यामुळे पोलिसांनी मुलाला विश्वासात घेऊन पुन्हा त्याची चौकशी केली. यानंतर मात्र, मुलगा फार वेळ खोटं लपवू शकला नाही. पोलिसांचा दबाव आल्याने त्याने खरी हकिगत सांगितलं. अशी घटना घडलीच नसल्याचं त्याने कबूल केलं. शाळेत कमी गुण मिळाले, घरी आल्यावर घरचे ओरडतील. म्हणून असा बनाव रचल्याचं त्याने सांगितलं.