घरदेश-विदेशमुंबईतील चोरीच्या मोबाईल फोनची विक्री बांगलादेश आणि नेपाळ देशात

मुंबईतील चोरीच्या मोबाईल फोनची विक्री बांगलादेश आणि नेपाळ देशात

Subscribe

चोरीचे मोबाईल फोनची तस्करी करणारी टोळी मुंबई पोलिसांच्या हाती

रेल्वे प्रवाशांचे तसेच शहरातून चोरलेल्या मोबाईल फोनची विक्री थेट बांगलादेश आणि नेपाळमध्ये केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मोबाईल चोराकडून चोरीचे मोबाईल फोन विकत घेऊन ते देशाबाहेर पाठवणार्‍या टोळीच्या म्होरक्यासह तीनजणांना मुंबईतील विलेपार्ले पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या दोघांकडून ५७ मोबाईल फोनचे पार्सल हस्तगत केले असून हे सर्व मोबाईल फोन चोरीचे असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चोरीचे मोबाईल देशाबाहेर पाठवणार्‍या टोळीचे जाळे पश्चिम बंगाल पासून बांगलादेशापर्यंत पसरले आहे. या टोळीत २० जण काम करत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

मुंबईतील उपनगरीय रेल्वेत तसेच मुंबईतील रस्त्यावर दररोज सरासरी १५० मोबाईल फोन चोरीला जात असल्याची नोंद आहे. यामध्ये सर्वात अधिक मोबाईल फोनची चोरी रेल्वेच्या हद्दीतून होत आहे. प्रवाशाचा हातावर फटका मारून मोबाईल फोन चोरी करण्याच्या घटनांमध्ये भयंकर वाढ झाली असून त्यात अनेक प्रवाशांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. पूर्वी चोरलेले मोबाईल फोन मुंबईतील तसेच मुंबईबाहेरील मोबाईल दुकानदार, मोबाईल रिपेरिंग करणारे सहज विकत घेत होते. मात्र पोलिसांनी चोरीचे मोबाईल विकत घेणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केल्यामुळे चोरीचा मोबाईल विकणे अवघड झाले आहे. मात्र आता हेच चोरीचे मोबईल फोन थेट देशाच्या बाहेर जाऊ लागल्यामुळे मोबाईल चोरीच्या धंदा तेजीत आला आहे.

- Advertisement -

मुंबई तसेच आसपासच्या शहरात चोरीचे मोबाईल फोन कवडीमोल भावात घेणार्‍या टोळ्या निर्माण झाल्या असून या टोळ्यांचे जाळे नेपाळ, बांगला देशपर्यंत पसरले आहे. विलेपार्ले पोलिसांनी अशाच एका टोळीच्या म्होरक्यासह तीनजणांना विलेपार्ले येथून अटक केली आहे. जाहिद अहमद खान, मोहम्मद मोबिद शेख आणि मोहम्मद हसन शेख असे अटक करण्यात आलेल्या चोरांची नावे आहेत. जाहिद हा या टोळीचा म्होरक्या असून त्याच्या टोळीत सुमारे २० जण काम करतात. या टोळीचे इतर सदस्य मुंबईसह देशाबाहेरही काम करतात.

विलेपार्ले पोलिसांनी जाहिद आणि त्याच्या साथीदाराला एका कुरिअर कंपनीजवळून अटक केली आहे. जाहिद आणि त्याचे दोन साथीदार ५७ महागड्या मोबाईलचे पार्सल घेऊन ते पश्चिम बंगाल येथे कुरिअर करण्यासाठी आले होते. त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर ही धक्कादायक माहिती समोर आली. जावेद आणि त्याच्या टोळीतील इतर सदस्य मुंबई तसेच मुंबई बाहेरील मोबाईल चोरट्याकडून कवडीमोल भावात चोरीचे मोबाईल फोन विकत घेऊन ते चोरीचे मोबाईल नवीन मोबाईलच्या किमतीपेक्षा अर्ध्या किमतीत बांगलादेश आणि नेपाळ येथे विकत असल्याची बाब समोर आली आहे.

- Advertisement -

विलेपार्ले पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांच्याजवळून ५७ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या मोबाईल फोनची किंमत ७ लाख ८९ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या इतर सहकार्‍यांचा कसून शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. विलेपार्ले पोलिसांनी केलेली ही कारवाई सर्वात मोठी कारवाई आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -