तत्कालीन फडणवीस सरकारने चालू केलेली आणखी एक योजना ठाकरे सरकारने रद्द केली आहे. आणीबाणीच्या काळातील बंदीवानांसाठी तत्कालीन भाजप सरकारने सुरू केलेली सन्मान योजना बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर झालेला परिणाम आणि आर्थिक संकटामुळे ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीत अधिकृत आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात २३ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे राज्याच्या कर आणि करेत्तर महसुलात घट होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यामुळे १९७५-७७ या आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीकरिता लढा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, गौरव करण्यासंबंधीची योजना बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलं आहे.
मध्य प्रदेशमधील तत्कालीन सरकारने ही पेन्शन योजना सुरु केल्यानंतर याच धर्तीवर राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारने महाराष्ट्रात ही योजना लागू केली होती. जानेवारी २०१८ पासून लाभार्थ्यांना पेन्शन देण्यात येत होती. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या योजनेवर आक्षेप घेण्यात आला होता. शिवाय, नितीन राऊत यांनी ही योजना गैर आहे आणि त्यामुळे ही योजना बंद करण्याची मागणी केली होती.