औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याबाबत शिवसेना गंभीर असून हीच ती अनुकूल वेळ आहे. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते याबाबत लवकरच निर्णय घेतील. काही तांत्रिक गोष्टी आहेत. मात्र, यावरही तोडगा निघेल. यापूर्वी विभागीय आयुक्तांना तसा प्रस्तावही पाठवलेला आहे. याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल, असे मत औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.
औरंगाबादच्या रामा हॉटेलमध्ये सुभाष देसाई यांनी काही उद्योजकांशी संवादही साधला. उद्योगांवर हल्ला निषेधार्हच आहे, तो खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. उद्योजकांसोबत त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत उद्योजकांना छोट्या-मोठ्या काही अडचणी असतील तर त्याही त्यांनी सांगाव्या म्हणजे पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करता येईल, असे त्यांनी म्हटले. उद्योगांवर राज्यात कुठेच असले हल्ले सहन केले जाणार नाही, असेही सुभाष देसाई यांनी सांगितले.
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची हीच ती वेळ आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराचे नाव संभाजीनगर केले होते. त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री आहेत. शिवाय त्यांना पाठिंबा देणारे दोन पक्ष सोबत आहेत. त्यामुळे औरंगाबादेचे नाव संभाजीनगर करण्यास काहीही अडचणी येणार नाहीत, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.