घरदेश-विदेशतीन महिन्याचे रेशन,गॅस सिलिंडर मोफत

तीन महिन्याचे रेशन,गॅस सिलिंडर मोफत

Subscribe

महिलांच्या खात्यात ५०० तर शेतकर्‍यांना २ हजार,

लॉकडाऊनच्या काळात देशातील गरीब व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार, आगामी तीन महिने गरीबांना ५ किलो तांदूळ अथवा गहू मोफत मिळणार आहे. तसेच देशातील आठ कोटी कुटुंबांना तीन महिने गॅस सिलेंडरही मोफत दिला जाणार आहे. अनाथ, विधवा महिलांच्या खात्यात ५०० रुपये जमा होतील. तर शेतकर्‍यांना प्रत्येकी २ हजार रुपये दिले जाणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये याची काळजी घेऊ, असे सांगत अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी 1 लाख 70 हजार कोटीचे पॅकेज जाहीर करण्यात येत आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरजूंना त्याचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान अन्न योजनेअंतर्गत, एकही गरीब अन्नाशिवाय राहू नये याची दक्षता घेण्यात येईल. जवळपास 80 लाख लाभार्थ्यांना पुढील तीन महिने 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल, सध्या मिळत असलेल्या सोडून अतिरिक्त मिळेल. शिवाय त्यासोबत एक किलो डाळही मोफत मिळेल.

- Advertisement -

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) चे योगदान भारत सरकार देईल. नियोक्ता आणि कर्मचारी या दोघांच्यावतीने ते देण्यात येईल. हे पुढील तीन महिन्यांसाठी असेल. ज्या संस्थांमध्ये 100 पेक्षा कमी कर्मचारी आहेत आणि 90 % पेक्षा कमी कर्मचार्‍यांचा पगार 15 हजारांपेक्षा कमी आहे, त्या संस्थाना हा नियम लागू होईल. कोरोना महामारीमुळे ईपीएफच्या नियमात बदल करण्यास सरकार तयार आहे. जेणेकरुन पीएफ खात्यात जमा झालेला 75% नॉन रिफंडेबल रक्कम किंवा तीन महिन्यांचा पगार (जे कमी असेल ते) काढता येतील, असे सीतारामन यांनी सांगितले.

मातृशक्ती, महिला ज्यांचे जनधन खाते आहे, त्या साडेवीस कोटी लाख महिलांच्या खात्यात तीन महिन्यांसाठी दर महिन्याला 500 रुपये जमा होतील. तसेच वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांना पुढील तीन महिन्यांसाठी अतिरिक्त एक हजार रुपये – तीन कोटी विधवा, वृद्ध, दिव्यांगाना लाभ, डायरेक्ट खात्यात मिळतील. मनरेगा माध्यमातून काम करणार्‍यांची रोजंदारी 182 वरुन 202 रुपयांपर्यंत वाढवली आहे. 130 कोटी जनतेचे पोट भरण्यासाठी शेतकरी दिवसरात्र राबतो त्यांना त्रास होऊ नये, यासाठी शेतकर्‍यांच्या खात्यात 2 हजार रुपये भरणार, देशातील 8 कोटी 70 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात हे दोन हजार रुपये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरले जातील, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

आठ कोटी ३० लाख कुटुंबांना मोफत सिलिंडर
आठ कोटी 30 लाख कुटुंबांना ‘उज्ज्वला गॅस योजने’ अंतर्गत पुढचे तीन महिने मोफत सिलिंडर मिळणार आहे. 63 लाख महिला बचत गटांना 10 लाखांऐवजी 20 लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्जपुरवठा केला जाणार आहे. याचा लाभ 7 कोटी कुटुंबांना होणार आहे. जनधन खाते असलेल्या 20 कोटी महिलांना पुढील तीन महिने 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळेल.

आरोग्य सेवक-सेविकांचा ५० लाखांचा विमा
करोनाला रोखण्याच्या मोहीमेत युद्धपातळीवर काम करणार्‍या स्वच्छता कर्मचारी, आरोग्य सेवक, आशा वर्कर, डॉक्टर, नर्स तसेच पॅरामेडिकल स्टाफला सरकारने विमा सुरक्षा पुरवली आहे. या सेवेतील कर्मचार्‍यांना ५० लाखांचा विमा पुरवण्यात आला असे सीतारामन यांनी सांगितले.

पॅकेजची ठळक वैशिष्ट्ये
= केंद्र सरकारचे 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज
= प्रधान मंत्री अन्न कल्याण योजनेची घोषणा
=आरोग्य सेविकांसह वैद्यकीय कर्मचार्‍यांना 3महिन्यांसाठी 50 लाखांच्या विम्याचे कवच
= शहर-ग्रामीण भागातील गरीब, स्थलांतरीत मजुरांना तातडीने मदत
= अन्न कल्याण योजनेंतर्गत, 10 किलो गहू किंवा 10 किलो तांदूळ,1 किलो डाळ मोफत
= 80 कोटी लोकांना अन्न कल्याण योजनेचा लाभ
= आठ कोटी 69 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रु.
= रोजगार हमी योजनेच्या प्रत्येक मजुराच्या खात्यात 2 हजार रुपये.
= अन्न कल्याण योजनेंतर्गत तीन महिने मोफत धान्य पुरवठा
= रोहयो अंतर्गत रोजच्या मजुरीत दररोज182 वरुन 202 रु.पर्यंत
= तीन कोटी ज्येष्ठ नागरिक,विधवा, दिव्यांगांना 1 हजार रु.
= दिव्यांगांना 1 हजार रुपयांचे अतिरीक्त सानुग्रह अनुदान
= जनधन खातेधारक 20 कोटी महिलांना 3 महिने 500 रुपये अनुदान
= दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस सिलिंडर
=आठ कोटी 30 लाख कुटुंबांना 3 महिने मोफत सिलिंडर
= 63 लाख बचत गटांना 10 ऐवजी 20 लाखांचा व्याजमुक्त कर्जपुरवठा
=100 पेक्षा कमी कर्मचार्‍यांच्या कंपन्यांतील 15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्यांचा ईपीएफ सरकार 3 महिने भरणार

एक प्रतिक्रिया

  1. ही मदत नक्की कोनाला मिळणार कारण असेही लोक आहेत की ते रोजंदारी साठी मुंबई पूने ठीकाणी काम करतात त्यांना कशी होणार मदत .

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -