राज्य सरकार लसीकरणात दुजाभव करत असल्याची टीका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. लसीकरणात ठाण्याला झुकतं माप दिलं जात असून डोंबिवलीकरांशी दुजाभाव केला जात असल्याचा आरोप राजू पाटील यांनी केला आहे. यामुळे आता ठाणेकर विरुद्ध डोंबिवलीकर असे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
ठाणे महानगरपालिकेला कोरोना लसीचे तीन हजार डोस उपलब्ध झाले आहेत. यापैकी बहुतांश लसी ठाण्याच्या वाट्याला जाताना दिसत आहेत. कारण कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत केवळ एकच लसीकरण केंद्र चालवण्यात येणार आहे. तर कल्याण पूर्व आणि डोंबिवली पूर्व-पश्चिमेला कोरोना लसीच्या नव्या खेपेतील एकही डोस मिळाला नसल्याचं दिसतंय. यावरुन राजू पाटील यांनी ट्विट करत सरकारला सवाल केला आहे.
“ठाण्यात ३००० च्या आसपास लसींचे डोस दिले जाणार, KDMC त फक्त कल्याण पश्चिमेला एका ठिकाणीच लसीकरण होणार. डोंबिवली व कल्याण पूर्व शुन्य डोस. एकीकडे राजकारण करू नका असे उपदेश देता, मग हे काय चालू आहे?” असा सवाल राजू पाटील यांनी राज्य सरकारला केला आहे. या ट्विटमध्ये राजू पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना मेंशन केलं आहे.
उद्या ठाण्यात ३००० च्या आसपास लसींचे डोस दिले जाणार, KDMC त फक्त कल्याण पश्चिमेला एका ठिकाणीच लसीकरण होणार. डोंबिवली व कल्याण पूर्व शुन्य डोस. एकीकडे राजकारण करू नका असे उपदेश देता, मग हे काय चालू आहे ? @OfficeofUT @mieknathshinde @rajeshtope11 pic.twitter.com/5Y9DLrjYPG
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) May 10, 2021
आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्याला जास्त डोस; टोपेंनी आरोप फेटाळला
केंद्राकडून मिळालेल्या २६.७७ लाख लसींचे राज्य सरकार मनमानी वाटप करत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जालना जिल्ह्याला १७ हजार ऐवजी ६० हजार डोस अधिक देण्यात आले. त्यामुळे राज्यात अन्यत्र लसीचा तुटवडा झाला आहे. राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?, अशा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला होता. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे आरोप फेटाळले. ठरलेल्या सुत्रानुसार डोस देण्यात आले आहेत, असं टोपे यांनी सांगितलं.