राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, मुंबईसह, ठाणे परिसरात पावसाने हजरी लावली आहे. मुंबईत पावसाने उघडीप दिल्यामुळे उष्णतेत वाढ झाली होती. पण, रात्री पाऊस झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान दोन दिवसाच्या उघडीपीनंतर लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. औसा आणि निलंगा तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. येत्या चार दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईत काही दिवसांपासून अतिशय उष्ण, दमट हवामान होते. अकेर रात्री पाऊस झाल्यमुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान येत्या 2 ते 3 दिवसात मुंबईत आणखी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडू करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यातील पावसाचा शेतीला फटका –
लातूर जिल्ह्यात आषाढी एकादशीपासूनच पावसाने जोर धरला आहे. दोन दिवसाच्या उघडीपनंतर काल जिल्हाभरात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. औसा आणि निलंगा तालुक्यातील काही ठिकाणी कमी वेळात तुफान पावसाची नोंद झाली. औसा तालुक्यातील अपचुंदा, तपसेचिचोली, लामजना, मंगरुळ शिवारात कमी कालावधीत तुफान पाऊस झाला. तर निलंगा तालुक्यातील शेडोळ शिवारात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे शेडोळ आणि लामजना शिवारात सर्वाधिक नुकसान झाले. या भागातील ओढ्यांना आणि नाल्यांना पूर आला आहे. या भागातील अंतर्गत रस्त्यावर असणारे छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत.