पुणे : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव करत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला. जयश्री जाधव यांनी सत्यजित कदम यांचा 18 हजार 800 मतांनी पराभव केला. जयश्री जाधव यांना 26 फेरीअखेर 96 हजार 226 मतं मिळाली. तर सत्यजित कदम यांना 77 हजार 426 मतं मिळाली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय. त्यालाच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना उत्तर दिलंय.
पहिली प्रतिक्रिया कालच दिली आणि दुसरी देण्याची आवश्यकता नाही. आम्हाला मिळालेल्या मतांवर आम्ही समाधानी आहोत. अतिशय मोठ्या प्रमाणात मतदार आमच्याकडे वळलेला आहे. ती पोकळी आम्ही भरून काढतो आहोत. तसं काल केल्याचं दिसलेलं आहे. आम्ही एकटे लढलो तरी भाजप-सेना आधी एकत्र लढली होती, त्यापेक्षा जास्त मतं आहेत. ते तिघे लढले तरी त्यांची मतं वाढलेली नाही आहेत. आताचं व्होट हे सिम्पतीचं व्होट आहे. त्यामुळे 2024 साली ही जागा आम्ही 100 टक्के जिंकणार आहोत, याबद्दल माझ्या मनात खात्री आहे, असा विश्वासही देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय.
आमच्या भूमिकेनुसार आम्ही चालत राहू : देवेंद्र फडणवीस
पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरेंच्या 3 मेपर्यंतच्या अल्टिमेटमच्या भूमिकेवर विचारले असता ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाची आपली भूमिका असते. वेळोवेळी आम्ही मांडत असतो. आमच्या भूमिकेनुसार आम्ही चालत राहू. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी 5 जूनला अयोध्येचा दौरा करणार असल्याची घोषणा केली होती, त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीय, अयोध्येचा दौरा कोणीही करायला हरकत नाही. कारण प्रभू श्रीराम हे आपले दैवत आहेत. त्यांचं दर्शन घेण्याकरिता कोणी जाणार असेल तर त्याचं स्वागतच आहे. आम्हीदेखील त्या ठिकाणी जात असतो आणि कुठल्याही व्यक्तीला तिथे जावंसं वाटणं त्यात काही गैर नाही. कारण प्रभू श्रीरामांचं एवढं मोठं आणि भव्य मंदिर त्या ठिकाणी होतंय. त्याची भव्यता पाहण्याची इच्छा आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्याची इच्छा ही स्वाभाविक आहे. याचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ लावण्याची आवश्यकता नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
हेही वाचाः संजय राऊत हे फ्रस्टेटेड व्यक्ती, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात