एमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी गुरूवारी औरंगाबादमध्ये खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीवर जाऊन फूलं अर्पण केली. औरंगजेब यांच्या कबरीला भेट दिल्यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. याप्रकरणी विरोधकांनी अकरुद्दीन ओवैसी यांच्यावर कारवाईची मागणी करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. अशातच आता देवेद्र फडणवीस यांनीही कारवाईची मागणी केली असून, त्याची जागा त्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं म्हटलं. तसंच, याप्रकरणी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.
“ठाकरे सरकारमध्ये हनुमान चालीसा म्हटली तर कारवाई आहे. परंतु, काश्मिर तोडण्याचा नारा देणाऱ्यांवर कारवाई नाहीये. शर्जीलवर कारवाई नाहीये. अकबरउद्दीन ओवेसी यांना सांगू इच्छितो की, औरंगजेबाच्या कबरीचा त्याठिकाणी महिमामंडण करून तुम्ही महाराष्ट्रात आणि देशातल्या देशभक्त मुसलमानांचा अपमान केलाय. औरंगजेब या देशामध्ये हिंदूंचा नाहीच पण मुसलमानांचाही नेता होऊ शकत नाही. कारण या देशावर त्याने आक्रमण केलंय. ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांना अक्षरश:हा तडफडवून त्यांची निघृण हत्या केली, अशा औरंगजेबाचे महिमामंडण आम्ही मान्य करणार नाही. त्यामुळे अशाप्रकारे जर त्याचे महिमामंडण कुणी करत असेल, तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
“छोट्या-छोट्या गोष्टी कारवाई करणारे, लिलावतीत एखादा फोटो ट्वीट झाला त्याच्यावर कारवाई करणारे आता का गप्प आहेत हा माझा सवाल आहे. त्यांनी कारवाई केली नाही तरी आम्ही हे सहन करणार नाही. त्याची जागा त्याला दाखवल्याशिवाय राहणार नाहीय.” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेनंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “उद्धवजी ज्या लोकांसोबत बसले आहेत. त्यांचीच निती ते चालवत आहेत.”, असं त्यांनी म्हटलं.
हेही वाचा – शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजप, मनसे आणि राणांचा समाचार घेणार