मुंबई महापालिका रुग्णालयात रुग्णांच्या तुलनेत परिचारिकांचे अत्यल्प प्रमाण पाहता प्रशासनाने वेळीच दखल घेऊन परिचारिकांची भरती न केल्यास सध्या कार्यरत परिचारिकांचा उद्रेक होईल. रुग्ण सेवेवर त्याचा विपरित परिणाम होईल, असा इशारा दि म्युनिसिपल युनियनतर्फे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
मुंबईत दिवसेंदिवस लोकसंख्येत वाढ होत आहे. पालिकेच्या केईएम, सायन, नायर या प्रमुख रुग्णालयात दररोज हजारोंच्या संख्येने विविध उपचारांसाठी रुग्ण येत असतात. काही दुर्घटनांत जखमी व्यक्ती उपचारसाठी, शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दररोज दाखल करण्यात येतात. तसेच, पालिकेच्या १६ सर्वसाधारण रुग्णालयातही जवळजवळ अशीच काहीशी गंभीर स्थिती आहे. तर दुसरीकडे रुग्ण संख्या वाढत असल्याने सध्या रुग्णालयातील रुग्ण कक्षेत अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात येऊन एका एका बेडवर दोन – दोन रुग्णांना ठेवून त्यांच्यावर कसेतरी उपचार केले जात आहेत. त्यामुळे सध्या १०० रुग्णांमागे एक ते दोन परिचारिका अशी गंभीर स्थिती आहे.
याबाबत दि म्युनिसिपल युनियनने यापूर्वी अनेकदा पालिका प्रशासनाला, पालिका आयुक्त यांना परिचारिका यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली होती. मात्र पालिका प्रशासनाने त्याबाबत दुर्लक्ष केले. त्यामुळे आता प्रशासनाने जर इंडियन नर्सिंग कौन्सिलच्या नॉर्मसनुसार, परिचारिका यांची रिक्त पदे वेळीच भरल्यास सध्या रुग्णालयात कार्यरत परिचारिकांवर येणारा त्राण व त्याचा परिचारिका यांना होणारा त्रास पाहता त्यांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसे झाल्यास त्याचा रूग्णालय सेवेवर विपरीत परिणाम होईल, असा इशारा रमाकांत बने यांनी दिला आहे.
हेही वाचा – एमआयएम आमदार अकबरउद्दीन ओवेसी यांच्यावर कारवाई करणार का?, देवेद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल