एकीकडे ठाण्यात लागू असलेला लॉकडाऊन संपण्यासाठी आता दोनच दिवस शिल्लक असताना ठाण्यात कोरोनाचा फैलाव मात्र अजूनही ओसरायचं नाव घेत नाहीये. गेल्या २४ तासांच्या आकडेवारीचा विचार केला, तर ठाण्यात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ठाण्यातल्या एकूण मृतांचा आकडा ५४७ इतका झाला आहे. याशिवाय ३४२ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, दुसरीकडे एकाच दिवसात १२७७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्यामुळे ही प्रशासनासाठी आणि ठाणेकरांसाठी देखील दिलासादायक बाब ठरली आहे. सध्या ठाणे शहरमध्ये एकूण ५ हजार ३२४ रुग्ण उपचार घेत आहेत, तर एकूण ९ हजार ६४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ठाण्यात १८ जुलैपर्यंत एकूण ६७ हजार ६१६ चाचण्या घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
२ जुलैरोजी ठाणे शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. हा लॉकडाऊन १२ जुलैपर्यंतच ठेवण्यात आला होता. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा लॉकडाऊन पुन्हा १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला. अजूनही कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली नसल्यामुळे लॉकडाऊनचं काय करायचं? यावर प्रशासकीय स्तरावर बैठका सुरू असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.