अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ शिवाजी चौकात असलेलं स्वच्छतागृह नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले आहे. या स्वच्छतागृहात काही फेरीवाले आपले सामान ठेवत होते आणि तेथील पाण्याचा वापर भाजी धुण्यासाठी करीत होते. अशा अनेक कारणांमुळे हे स्वच्छता गृह वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आज २२ मार्च रोजी अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी एमएमआरडीएच्या अभियंत्यांसह या ठिकाणी कारवाई केली.
पोलीस बंदोबस्तात कारवाई
अंबरनाथ ( पूर्व ) येथील शिवाजी चौकात असलेल्या स्वच्छतागृहावर कब्जा करणाऱ्या काही व्य़क्तींनी यावेळी विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलीस बंदोबस्तात कारवाई करून स्वच्छतागृह अखेर पाडण्यात आले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत अंबरनाथ शहरात तीन वर्षांपूर्वी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात आली होती. त्यामुळे केंद्रशासनातर्फे अंबरनाथ नगरपालिकेचा गौरव देखील करण्यात आला होता. मात्र या काळात अंबरनाथ पूर्वेतील हे स्वच्छतागृह वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. हे स्वच्छतागृह नगरपालिकेकडून चालवण्यात येत होते. त्यासाठी लागणारे पाणी, वीज, साफसफाई नगर परिषदेच्या खर्चातून केली जात होती. मात्र येथे येणाऱ्या नागरिकांकडून बेकायदेशीर पद्धतीने पैसे वसुली सुरु होती.
रस्ता रुंदीकरणासाठी कारवाई
पाण्याचा वापर भाज्या धुण्यासाठी, फेरीवाल्यांचे सामान ठेवण्यासाठी, एवढेच नाही तर स्वच्छता गृहाच्या दरवाजाजवळच काही फेरीवाले ठाण मांडून बसलेले असत , शेवटी त्याच्या दरवाजाची दिशा देखील बदलावी लागली. शिवाजी चौकाशेजारी रस्ता रुंदीकरण करण्यासाठी हे स्वच्छतागृह आणि शेजारील रिक्षा संघटनेचे कार्यालय पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वच्छतागृह हटवल्याने येथील रस्ता मोकळा करण्यास मदत होणार आहे.