पालघर येथील भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी आगरी सेनेने मुंबई-अहमदाबाद मार्गावर आज, शुक्रवारी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. हातात भगवे झेंडे घेऊन त्यांनी निदर्शने केली. तर सरकारविरोधी घोषणाही दिल्या. आपल्या न्याय हक्कांसाठी आगरी सेनेने रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत घेतला होता. त्यानुसार आज सकाळी १० वाजता शिरसाडनाका येथून आंदोलनाला सुरुवात झाली. ‘आमच्या साध्या मागण्या आहेत. पालघरमध्ये राहणाऱ्या नागरीकांना खुप कष्ट करावे लागते. नव्याने वाढणाऱ्या रेसिडेंशियल क्षेत्रामुळे पाणी कमी प्रमाणात मिळत आहे. बुलेट ट्रेनसारख्या नवीन प्रकल्पांसाठी स्थानिक नागरीकांकडून बळजबरीने जमिनी घेतल्या जात आहेत. आम्हाला यावर ठोस उपाय योजना हव्या आहेत, असं आगरी सेनेचे अध्यक्ष राजाराम साळवी म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत.
वाचा – आगरी सेना मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोखणार
विविध समाजातील घटक आंदोलनात
रास्तारोको आंदोलनासोबतच बाईक रॅलीसुद्धा काढण्यात येणार असून या आंदोलनात फक्त आगारी समाजचं नव्हे तर वेगवेगळ्या समाजातील नागरिक, भूमिपुत्र सहभागी होणार आहेत. कोळी, आगरी, आदिवासी, शेतकरी, कामगार हे देखील सहभागी झाले असल्याचे सांगितले जात आहे. पालघर जिल्हामध्ये दुष्काळ परिस्थिती ओढावली आहे. परंतु अजूनही दुष्काळ जाहिर केलेला नाही आणि त्याचा सामना स्ठानिक शेतकऱ्यांना करावा लागत आहे, असे नागरिकांनी सांगितले.
वाचा – आगरी महोत्सव समाजापुरता मर्यादित नाही – गुलाब वझे
भूमिपुत्रांच्या मागण्या
- तुंगारेश्वर पर्वतातील तार्थक्षेत्र परशुरामकुंड, पारोळकडून येणारा मार्ग तसेच सातिवलीकडून येणारा मार्ग हे दोन्ही रस्ते तयार करावे.
- तुंगारेश्वर पर्वतावरील मंदिराला देवस्थान म्हणून परवानगी द्यावी.
- सरकारच्या विविध प्रकल्पांमध्ये भूमिपुत्रांना तृतीय आणि चतुर्थश्रेणीच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणे.
- ओएनजीसी सर्व्हेशनासाठी मासेमारी बंद करण्यात आली आहे. यादरम्यान मच्छीमारांना नुकसान भरपाई द्यावी.
- वसई-विरार महापालिका क्षेत्रातील मालमत्ताकरांमध्ये केलेली वाढ रद्द करावी.