शासकीय कामात आता आईचे नाव बंधनकारक या सरकारच्या निर्णयानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या निर्णयाचे तंतोतंत पालन केले आहे. मंत्रालयातील अजित पवार यांच्या कार्यालयाबाहेरील नावाच्या पाटीवर त्यांच्या आई आशाताई पवार यांचे नाव असलेली पाटी लावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली. (ajit pawar change his name plate and add his mothers name in mantralay office)
राज्याचे बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चौथे महिला धोरण शुक्रवार, 8 मार्च रोजी लागू करण्यात आले. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी या चौथ्या महिला धोरणाची घोषणा केली. या महिला धोरणानुसार शासकीय कामात आता आईचे नाव बंधनकारक करण्यात आले असून, सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील आपल्या नावाची पाठी बदलली. या पाटीवर सरकारी नियामांनुसार, ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ असे नाव लिहिण्यात आले आहे. याबाबत एक्सवर (ट्विटर) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर रुपाली चाकणकर यांनी फोटो शेअर केला आहे. तसेच, “राज्याचं चौथं महिला धोरण ८ मार्च रोजी लागू झाल्यानंतर पहिल्याच कार्यालयीन दिवशी मंत्रालयात झळकली ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ नावाची पाटी”, असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टला रुपाली चाकणकर यांनी आधी ती असा हॅशटॅगही वापरला आहे.
#आधी_ती
राज्याचं चौथं महिला धोरण ८ मार्च रोजी लागू झाल्यानंतर पहिल्याच कार्यालयीन दिवशी मंत्रालयात झळकली ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ नावाची पाटी.@mahancpspeaks @AjitPawarSpeaks @iAditiTatkare pic.twitter.com/QNzwCXCuZ6— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 11, 2024
दरम्यान 8 मार्च महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या चौथ्या महिला धोरणात महिला व मुलींच्या आरोग्याशी संबंधित उत्पादने आणि सेवांवरील वस्तू व सेवा कर माफ किंवा कमी करणे, मुद्रांक शुल्कावर सवलत देणे; तसेच पिवळी व केशरी शिधापत्रिकाधारक महिलांना सरकारी रुग्णालयांत मोफत उपचार देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, पाल्याला शाळेत प्रवेश घेताना वडिलांच्या आधी आईचे नाव लिहिले जाईल, अशीही तरतुद या धोरणात करण्यात आली आहे.
राज्याचे पहिले महिला धोरण सन 1994, दुसरे धोरण सन 2001 व तिसरे धोरण 2013मध्ये जाहीर करण्यात आले होते. तिसरे महिला धोरण जाहीर होऊन 10 वर्षांचा कालावधी उलटल्यामुळे चौथ्या महिला धोरणाची आवश्यकता होती. त्यानुसार राज्याच्या महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी या चौथ्या महिला धोरणाची घोषणा केली.
हेही वाचा – Ajit Pawar : मुद्द्याचं काय ते बोला; अजित पवार माध्यमांवर बरसले, तर सुळे म्हणतात, ती बिझी माणसं