घरमुंबई“अण्णा नक्की कोणाच्या बाजूने?”; सामनातून शिवसेनेचा संतप्त सवाल

“अण्णा नक्की कोणाच्या बाजूने?”; सामनातून शिवसेनेचा संतप्त सवाल

Subscribe

अण्णा हजारे यांच्या आंदोलन स्थगितीच्या निर्णयावर शंका उपस्थित केली जात असून, शिवसेनेनेकडून अण्णा हजारे यांना सवाल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्यापासून होणाऱ्या आपल्या उपोषणाला स्थगिती दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले. अण्णा हजारे ३० जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या शिष्टाईला यश आले असल्याची चर्चा आहे. मात्र अण्णा हजारे यांच्या आंदोलन स्थगितीच्या निर्णयावर शंका उपस्थित केली जात असून, शिवसेनेनेही अण्णा हजारे यांना सवाल केले आहेत. तर शिवसेनेने अण्णांच्या या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल. कृषी कायद्यांबाबत त्यांची भूमिका काय आहे? या शेतकऱ्यांना अण्णांचा पाठिंबा आहे का? अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला कळायला हवीत,’ असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

या निर्णयासंदर्भात शिवसेनेने सामना अग्रलेखातून शंका उपस्थित करणारे काही प्रश्न केले आहेत. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अण्णा हजारे यांनी निर्णायक उपोषणाची घोषणा केली होती व अण्णांनी उपोषण करू नये म्हणून महाराष्ट्रातील भाजपा पुढारी राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांशी चर्चा करीत होते. हे चित्र तसे गमतीचेच होते आणि घडलेही अपेक्षेप्रमाणेच. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केले. ‘केंद्र सरकारला आपण शेतकऱ्यांशी संबंधित १५ मुद्दे दिले आहेत. त्यावर केंद्र सरकार नेमणार असलेल्या उच्चस्तरीय समितीमध्ये योग्य ते निर्णय होतील, असा आपल्याला विश्वास वाटतो म्हणून आपण आपले उपोषण स्थगित करीत आहोत,’ असे अण्णांनी सांगितले. अण्णांनी उपोषणाचे अस्त्र बाहेर काढायचे आणि नंतर ते म्यान करायचे असे यापूर्वीही घडले आहे. त्यामुळे आताही ते घडले तर त्यात अनपेक्षित असे काही नाही,” अशी शंका शिवसेनेकडून व्यक्त केली आहे.

- Advertisement -

मुळात उपोषणाचा इशारा देण्यामागचा अण्णांचा नेमका हेतू काय होता? कृषी कायदे रद्द करावेत असे आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणं आहे. अण्णा हजारे यांचे उपोषण शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी होते काय हे स्पष्ट झालेले नाही. तसे असते तर त्यांना मोदी सरकारविरोधात उघड भूमिका घ्यावी लागली असती. राळेगणमध्ये मनधरणीसाठी येणाऱ्या भाजपच्या पुढाऱ्यांना तसे स्पष्ट शब्दांत सांगावे लागले असते. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अण्णा दोन वेळा दिल्लीत आले व त्यांनी जंगी आंदोलन केले. या आंदोलनाच्या मशालींवर तेल ओतण्याचे काम तेव्हा भाजपा करीत होता, पण गेल्या सात वर्षांत मोदी राज्यात नोटाबंदीपासून लॉक डाऊनपर्यंत अनेक निर्णयांमुळे जनता बेजार झाली, पण अण्णांनी कूसही बदलली नाही असा आरोप होत राहिला. म्हणजे आंदोलने फक्त काँग्रेस राजवटीतच करायची काय? बाकी आता रामराज्य अवतरले आहे काय? अण्णा आज एकाकी पडले आहेत. राजकीय पक्षांनी त्यांना वेळोवेळी वापरून घेतले. त्यात अण्णांच्या शरीराची प्रचंड झीज झाली. उपोषण करणे व ती पुढे रेटणे ही साधी गोष्ट नाही. पुन्हा अण्णांचे वय पाहता त्यांनी जिवाचा धोका पत्करू नये. मागच्या उपोषणाचे परिणाम अण्णांच्या शरीराच्या अनेक अंगांना भोगावे लागत आहेत. पण अण्णांनी एखादे आंदोलन छेडणे यास आजही महत्त्व आहेच,” असे शिवसेनेने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -