पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नदीचे पाणी ओसरू लागले की पुन्हा मासेमारीला मोठ्या प्रमाणात सुरूवात होते. मात्र सध्या नदी किनारी मिळणार्या काळ्या चिंबोर्यांची विशेष चलती असून, खवय्यांकडून चिंबोर्यांना मोठी पसंती मिळत आहे. त्यासाठी अधिक पैसेही मोजले जात आहेत.
नवरात्रोत्सव संपल्यानंतर मांसाहार करणार्यांचा मच्छी, मटणापेक्षा चिंबोर्या खरेदी करण्याकडे काहीसा कल असतो. पाऊस थांबल्यानंतर नदीचे पाणी स्वच्छ झाले की स्थानिक नागरिक आणि आदिवासी रात्रीच्या वेळी नदीच्या किनारी गॅसबत्तीच्या सहाय्याने दगड, गोटे तुडवत तेथे असलेल्या बिळांतून चिंबोर्या पकडायला जाताना दिसतात. नदी किंवा किनारी मिळणारी चिंबोरी काळीभोर असून, मोठ्या कष्टाने तिला पकडावे लागते. मात्र कष्टाचे फळ नेहमीच चांगले असते, या उक्तीप्रमाणे पकडून आणलेल्या चिंबोर्यांना भावही चांगला मिळतो.
काळ्या चिंबोर्यांचे अनेक औषधी गुणधर्म असल्याने दर्दी खवय्ये त्यांची खरेदी करतात. पावसाळ्यानंतर वर्षभरात अगदी दोन ते तीन महिनेच नदीमध्ये चिंबोर्या सापडतात. काळ्या चिंबोर्यांना सध्या येथे मोठी मागणी असून, ६ मोठ्या चिंबोर्यांसाठी तब्बल 300 रुपयेही मोजले जात आहेत. त्यामुळे दिवसा किंवा रात्री चिंबोर्यांच्या रश्श्याचा तोंडाला पाणी आणणारा घमघमाट सध्या येथे अनुभवायला मिळत आहे.
पोलादपुरात चिंबोर्यांना मागणी आहे. चांगल्या भावात त्या विकल्या जात असून यामधून चांगला रोजगार मिळतो.
-राधाबाई चव्हाण, आदिवासी विक्रेती