देशासह जगभरात कोरोनाचा उद्रेक होत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून राज्यातील अनेक शहरांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लावले जात आहेत. दरम्यान मीरा-भाईंदर शहरातही कोरोना रुग्ण (corona virus) संख्या पुन्हा वाढत आहे. यापार्श्वभूमीवर मीरा- भाईंदर पालिकेने लंडनच्या धर्तीवर मीरा-भाईंदरमध्येही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. लंडनमध्येही कोरोनाची दुसरी लाट आल्याने तिथे खबरदारीचा उपाय म्हणून कडक निर्बंध लावण्यात आले तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून तेथे जब्बर दंड वसूल केला जात आहे. याचप्रमाणे मीरा भाईंदरमध्येही महानगरपालिका प्रशासनाकडून नवी निर्बंध आणण्यात आले आहेत. त्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये यापुढे अनेक सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ, मॉल, सिनेमागृह, बाजापेठा, ऑफिसेस याठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून मोठा दंड वसुल केला जाणार आहे. या नव्या निर्बंधांचे परिपत्रक मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त दिलीप ढोले यांनी काढले आहे. या परिपत्रकाप्रमाणे, एखादी संस्था, कार्यालय, मॉल आणि खाजगी कार्यालयांमध्ये राज्य सरकार आणि पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास २५ हजारांचा ठंड ठोठावला जाणार आहे. जर हा उल्लंघन पुन्हा झाले तर सदर कार्यालय, संस्था, मॉल, खाजगी कार्यालय ७ दिवसांसाठी सील केले जाणार आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त दिलीप ढोले यांनी पदाभार स्विकारल्यानंतर आज आयुक्त दालनात कोरोना लसीकरण आणि उपाययोजनांसाठी बैठक झाली. या बैठकीत पालिकेने नवे निर्बंधांचे परिपत्रक काढले. या परिपत्रकात मंगल कार्यालये, ऑफिस, मॉल वर 25 हजार रुपये दंड लावण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. लग्न हॉल, मॉल, सिनेमागृह, बाजार आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही यांची काळजी घेण्यासाठी नियमावलीचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तीवर ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. यासाठी पालिका आणि पोलीस एकत्रित काम करणार आहेत. तर मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात लग्न, किंवा मोठ्या कार्यक्रमांसाठी १०० लोकांची मर्यादा आखूण देण्यात आली आहे. त्यामुळे १०० पेक्षा अधिक नागरिक लग्नसमारंभात किंवा कार्यक्रमात दिसले तर कार्यक्रम आयोजकासह, हॉल मालकावर २५ हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे.
मीरा भाईंदरमध्ये बुधवारी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 94 ऑफिस, मॉल्स, मंगल कार्यालयाची पाहणी करण्यात आली. यावेळी 2 कार्यालयांवर तर 1 रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली. तर मास्क न घालून फिरणाऱ्या नागरिकांकडून 28 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. बुधावारी मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी 69 जण करोनाबाधित आढळले. तर आतापर्यंत 27 हजार 256 जण बाधित आढळले असून आतापर्यंत 804 जणांचा मृत्यू झाला आहे. मीरा- भाईंदरमधील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पालिकेनेही कंबर कसली आहे. तर नियम मोडणाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जात आहे.
हेही वाचा- संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर