मुंबई आणि परिसरातील शाळा पुन्हा उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाईल, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी सांगितले. यापूर्वी, एका टास्क फोर्सने संपूर्ण महाराष्ट्रात शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी चर्चा केली आहे. तज्ज्ञ पॅनेलने शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पूर्ण लसीकरणाची शिफारस देखील यावेळी करण्यात आहे. तर दिवाळीनंतर राज्यातील शाळा नियमितपणे सुरु होण्याची शक्यता असून कोरोनास्थिती नियंत्रणात राहिल्यास राज्यातील शाळा सुरु करण्यास टास्क फोर्स सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे.
The decision on reopening of schools in Mumbai and surrounding areas will be taken after Diwali: Mumbai Mayor Kishori Pednekar pic.twitter.com/Kodsz3aATq
— ANI (@ANI) September 23, 2021
दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून शाळा आणि महाविद्यालयं बंद आहेत. शाळा आणि महाविद्यालयं पूर्णपणे कधी सुरु होणार याकडे राज्यातील पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यात २ ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची परिस्थिती कशी असेल हे पाहून त्यानंतर कॉलेज सुरू करण्याबाबत निर्णय घेता येऊ शकतो. शाळांबाबत लहान मुलांच्या लसी आल्या की त्यांचे लसीकरण करायचे आणि दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याची आमची मानसिकता आहे. तेव्हा त्याबाबत मुख्यमंत्री आढावा घेतील, असे अजित पवार म्हणाले.
मुंबईत सक्रिय रूग्णांची संख्या ४० हजारांच्या खाली घसरल्याने तज्ज्ञांच्या मते, दुसरी लाट हळूहळू कमी होत आहे, त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका काहिसा कमी होताना दिसतोय.अलीकडील सिरो सर्व्हेमध्ये असे आढळून आले की, मुंबईच्या सुमारे ८७ टक्के लोकसंख्येमध्ये कोरोनाव्हायरस विरूद्ध अॅन्टीबॉडी विकसित आहेत.