घरमुंबईएकनाथ शिंदे नाराज? आग्रह करूनही वर्धापन दिन कार्यक्रमात बोलण्यास नकार

एकनाथ शिंदे नाराज? आग्रह करूनही वर्धापन दिन कार्यक्रमात बोलण्यास नकार

Subscribe

शिवसेनेचा ५६वा वर्धापन दिन रविवारी साजरा करण्यात आला, मात्र या कार्यक्रमातून शिवसेनेत सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमात भाषण करण्याचा आग्रह करूनही शिवसेनेचे नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करण्यास नकार दिला. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

खरंतर एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार मागील अनेक दिवसांपासून नाराज असल्याचे बोलले जात आहे. या आमदारांचा रोख युवासेनेचे नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या दिशेने असल्याचीही चर्चा आहे. मागील अडीच वर्षे आम्हाला फारशी किंमत दिली गेली नाही, मात्र आता नवनवे आदेश देऊन आमच्यावर अविश्वास दाखविला जात असल्याची भावना शिंदे समर्थक आमदार खासगीत व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आता पवईतील वेस्टिन हॉटेलमध्ये वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच एकनाथ शिंदे यांनी भाषण करण्यास नकार दिल्याने ते आणि त्यांचे समर्थक आमदार नाराज असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरच ही नाराजी उघडपणे समोर आल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे.

- Advertisement -

शिंदे यांच्या नाराजीचे आता आणखी एक कारण असल्याचे बोलले जात आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना तसेच अपक्ष आमदारांना वेस्टिन हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या आमदारांची मतदान ट्रायल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी झाली. यावेळी नेतृत्व उपस्थित असायला हवे अशी एकनाथ शिंदे यांची भावना होती. यावरूनही ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे हेवीवेट नेते समजले जातात. जवळपास दीड ते दोन डझन त्यांचे समर्थक आमदार आहेत. हे आमदार त्यांचे इतके कट्टर आहेत की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काम असले तरी आधी हे आमदार शिंदे यांनाच भेटतात. एवढेच नाही तर शिंदे यांच्याशिवाय शिवसेनेच्या एकाही मंत्र्याला हे आमदार जुमानत नाहीत, तर शिंदे यांचे स्पर्धक असलेले तसेच विरोधी गटातील मंत्री आणि आमदारांशी हे समर्थक आमदार फटकून वागतात.

- Advertisement -

शनिवारी झालेल्या आमदारांच्या बैठकीत या आमदारांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. यावेळी काही बाबींवर आक्षेप घेत शिंदे त्यांनी यांच्याकडे तक्रार केल्याचे बोलले जात आहे. या बैठकीच्या निमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस दिसून आली आहे, मात्र पक्षात कुठलेच मतभेद नाहीत. आम्ही सगळे एकत्र येऊन विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी झटत आहोत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -