दुर्गाडी परिसरातील नॅशनल उर्दू शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी सतर्कता बाळगण्यासाठी संरक्षण भिंतीलगतची बेकायदा घरे तातडीने रिकामी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच टेकडीवरील, धोकादायक व अतिधोकादायक इमारतीतील घरातील रहिवाशांना स्थलांतरीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा – बदलापुरात भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार; हल्लेखोर फरार
गेल्या सहा दिवसांपासून कल्याण-डेांबिवली शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे संरक्षण भिंत व धोकदायक इमारतीचा भाग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत या सूचना केल्या आहेत.
संक्रमण शिबिरांचा तुटवडा
पालिका हद्दीत एकूण ४७३ इमारती धोकादायक आहेत. मात्र, या इमारतीत हजारो कुटूंबं राहत आहेत. त्यामुळे हजारो कुटुंबांना स्थलांतरित केल्यास त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात संक्रमण शिबिरंही नाहीत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात लोकांना स्थलांतरीत कुठे करणार? असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.