‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत राज्य शासनाने काही नियमांचे शिथिलीकरण केले आहे. मात्र घराबाहेर केवळ अत्यावश्यक सेवेसाठी जाण्याची परवानगी आहे. तसेच घरापासून केवळ दोन किलोमीटर अंतरापर्यंतच जाण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यापेक्षा लांब गेल्यास कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.
मुंबई शहरात ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत राज्य शासनाने काही नियम शिथिल केले आहे. मात्र, लॉकडाऊन कायम असल्याने मुंबईकरांनी लॉकडाऊन आणि मुंबई पोलिसांनी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, शक्यतो पोलिसांना हस्तक्षेप किंवा कारवाई करण्यास भाग पाडू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
राज्य सरकारतर्फे ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अनेक परवान्या दिल्या असून करोनाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे मुंबईकरांनी स्वत:सह स्वत:च्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, सुरक्षित अंतर ठेवण्याच्या नियमांचे पालन करावे, अनेकजण मुंबई पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी स्वत:सह इतरांच्या आरोग्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या लॉकडाऊन मार्गदर्शक नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या नियमांचे पालन करा, नाहीतर कारवाई
*घराबाहेरील हालचाली केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच करावे.
*घराबाहेर पडताना चेहर्यावर मास्क अनिवार्य आहे.
*घरापासून केवळ दोन किलोमीटर परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकान आदी ठिकाणी जाता येईल. दोन किलोमीटरच्या बाहेर जाऊ नये. व्यायामाची परवानगी घरापासून दोन किलोमीटर परिसरातील मोकळ्या जागेपुरतीच मर्यादीत आहे.
*कार्यालयात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत दोन किलोमीटरच्या बाहेर परवानगी आहे. सुरक्षित अंतर ठेवणे या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. सुरक्षित अंतराचे नियम न पाळणार्या दुकानांवर कारवाई केली जाईल.
*रात्री नऊ ते पहाटे पाचदरम्यान कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनी बाहेर फिरल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
*वैध कारणाशिवाय आपल्या स्थानिक भागापासून दूर आढळून येणारी सर्व वाहने जप्त केली जातील.