घरदेश-विदेशचर्चा करायची तर १९६२ पासून करू

चर्चा करायची तर १९६२ पासून करू

Subscribe

अमित शहा यांचे राहुल गांधींना आव्हान

आम्ही चर्चेला घाबरत नाही, चर्चा करायचीच असेल तर या, संसदेत चर्चा करू, 1962 पासून ते आजपर्यंत दोन-दोन हात होऊन जाऊ द्या, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शहा म्हणाले चर्चेला कुणीही घाबरत नाही. मात्र, देशाचे जवान जेव्हा संघर्ष करत आहेत, सरकार निश्चित भूमिका घेऊन योग्य प्रकारे पावले टाकत आहे, तेव्हा पाकिस्तान आणि चीनला खूश करणारी वक्तव्य करणे योग्य नाही.

एकीकडे भारत आणि चीन यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे, तर दुसरीकडे याच मुद्यावर भाजपा आणि काँग्रेस यांच्यातही राजकीय द्वंद्व सुरू आहे. लडाखमध्ये एलएसीवर चिनी सैन्यासोबत झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. तेव्हापासून काँग्रेस भाजपवर सातत्याने हल्ला चढवत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सरेंडर मोदी अशी टीकाही केली होती. या मुद्यावर आता केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी, राहुल गांधींवर पलटवार केला आहे.

- Advertisement -

करोना आणि लडाखमधील गलवान खोर्‍यातील चीनशी सुरू असलेल्या तणावावर प्रश्न विचारण्यात आला असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत दोन्ही युद्ध जिंकत आहे, असे अमित शहा म्हणाले. भारत सरकारने करोना विरोधात चांगल्या पद्धतीने काम केले आहे. मी राहुल गांधींना सल्ला देऊ शकत नाही. हे काम त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे आहे. काही लोक वक्रदृष्टी आहेत, त्यांना चांगल्या गोष्टींमध्येही वाईटच दिसते.

भारताने करोना विरोधात चांगला संघर्ष केला आहे. जगाच्या तुलनेत आपले आकडे फार चांगले आहेत.यावेळी शहा यांनी आणीबाणीवरही भाष्य करत काँग्रेसवर हल्ला चढवला. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून रोजी आणीबाणी जाहीर करून देशातील लोकशाहीच्या मुळावर घाव घालण्याचे काम केले. हा कुठल्याही पक्षावरील हल्ला नव्हता, तर देशाच्या लोकशाहीवर केलेला हल्ला होता, असे शहा म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -