युएनआयजीएमई अर्थात युनायटेड नेशन इंटर एजन्सी ग्रुप फॉर चाईल्ड मॉर्टेलिटी एस्टिमेशनच्या अहवालानुसार, २०१७मध्ये भारतातील बालमृत्यूंची संख्या घटली आहे. पण असं असलं, तरी जगात सर्वाधिक बालमृत्यू असणाऱ्या देशात अजूनही भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये सुरु झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमुळे बालमृत्यूंचे प्रमाण कमी झाले असले, तरीही ५ ते ११ वयोगटातील बालकांच्या मृत्यूंमध्ये भारत आघाडीवर आहे. यामध्ये ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांचा समावेश अधिक आहे. अशाच एका ४ वर्षीय आदिवासी मुलाचे प्राण वाचवण्यात मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलला यश आले आहे.
जस्तीकला दुसऱ्या वर्षीच झाली कावीळ
सिल्वासा येथे राहणाऱ्या ४ वर्षांच्या जस्तीकला २ वर्षांपूर्वीच काविळीचा संसर्ग झाला. सतत ताप येत असल्यामुळे त्याचे वजन वाढतच नव्हते. जस्तीकच्या वडिलांनी सिल्व्हासा येथील अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला पण, आजाराचे निदान झाले नाही. अखेर सिल्वासाच्या विनोबा भावे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी जस्तीकच्या वडिलांना मीरा रोडमधल्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला.
तुम्हाला हे माहिती आहे का? – मुंबईकरांमध्ये वाढतंय उच्च रक्तदाबाचं प्रमाण!
वोक्हार्टमध्ये हिपॅटोब्लास्टोमाचं निदान
वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये जस्तीकच्या आजारासंबंधित सर्व वैद्यकीय चाचण्या तसेच सीटी स्कॅन करण्यात आला. यामध्ये जस्तीकला ‘हिपॅटोब्लास्टोमा’ नावाचा आजार झाल्याचं निदान झालं. या आजारामध्ये यकृताला कर्करोगाची गाठ येते. हिपॅटोब्लास्टोमा हा कर्करोग वैद्यकीय क्षेत्रामध्ये फारच दुर्मिळ मानला जातो. नवजात बालकांमध्ये देखील हा कर्करोग होऊ शकतो.
जस्तीकचे वजन आणि वय पाहता त्याच्या यकृताची गाठ काढणे अवघड होते. म्हणून त्याला आधी केमोथेरेपीचे ७ सायकल (डोस) देऊन ती गाठ कमी केली. त्यानंतर बालरोगतज्ञ विभागातील टीमच्या प्रयत्नाने ती गाठ काढण्यात यश आले. यावेळी यकृताचा ७० टक्के भाग काढण्यात आला असून पुढील ६ महिन्यांत यकृताची वाढ पूर्ववत होईल. जस्तीक आता पूर्णपणे बरा आहे. एवढ्या लहान बालकाच्या यकृतावर शल्यचिकित्सा करणे ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये दुर्मिळ बाब आहे.
डॉ. ललित वर्मा, बालरोग चिकित्सक, वोक्हार्ट हॉस्पिटल
या आजाराने का होतात बालमृत्यू?
पहिल्या ५ वर्षांपर्यंत नवजात बालकांमध्ये असणाऱ्या ह्रदय विकारांचं निदान होत नाही. त्यामुळे त्यांचा त्यातून मृत्यू होतो. तसेच, आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये असलेली पिण्याच्या पाण्याची कमतरता, अस्वच्छता, पोषण आहाराचा अभाव, प्राथमिक आरोग्य सुविधा नसणे ही प्रमुख कारणे मानली जातात.
काय सांगते आकडेवारी?
युएनआयजीएमईने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये नवजात बालकांच्या मृत्यूची संख्या २०१६ साली ८ लाख ६७ हजार होती, तर २०१७ साली यामध्ये या संख्येत घट होऊन ही संख्या ८ लाख २ हजार इतकी खाली आली आहे. दरम्यान, भारतात याच काळात म्हणजेच २०१६ साली नवजात बालकांचा मृत्यू दर हा १००० बालकांमागे ४४ इतका होता. जगभराचा विचार करता २०१७ साली जवळपास ६३ लाख मुलांचा मृत्यू १५ वर्षांच्या आतच झाला. याचा अर्थ प्रत्येक पाच सेकंदात एका बालकाचा मृत्यू झाल्याचं दुर्दैवी वास्तव समोर आलं आहे.
तुम्ही हे वाचलंत का? – पित्ताशयामध्ये १ फूट २ इंचाची गाठ! वोक्हार्टमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया