तब्बल दोन महिन्यांनंतर मुंबईत मिशन बिगीन अगेन अंतर्गत पुन्हा बेस्ट बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. मिशन बिगीन अगेनच्या तिसऱ्या टप्प्यात खासगी कार्यालयांना १० टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्याची परवानगी देखील देण्यात असल्याने प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता बेस्टकडून बसेसचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणारी उपनगरीय लोकल सेवा देण्यास सज्ज आहे.
मात्र ही सेवा फक्त सरकारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असल्याने खासगी कर्मचारी मात्र अजूनही बसेसच्या भरोशावर असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची लोकल सेवा सुरु झाली असली तरी खासगी कर्मचाऱ्यांना मात्र बसशिवाय कोणताही पर्याय नाही.
बसेसची संख्या वाढवण्याची मागणी
आजपासून सुरू करण्यात आलेली मुंबई लोकल ट्रेन ही फक्त आवश्यक कर्मचारी म्हणजेच सर्व महानगरपालिका, मुंबई पोलिस, बेस्ट, मंत्रालय, सर्व रुग्णालयीन कर्मचारी (सरकारी व खाजगी) यांच्यासाठी असल्याचे सांगितले गेले आहे. परंतु या निर्णयामुळे खासगी कर्मचारी पहाटेपासूनच बसच्या रांगेत उभे आहेत. संपुर्ण दिवसाचे आठ तास प्रवासातच जात असल्याने बसेसची संख्या वाढवण्याची मागणी हे कर्मचारी करत आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजपासून रेल्वेसेवा सुरु झाली असली, तरी खासगी कर्मचारी कल्याण एसटी डेपोमध्ये आजही बसेसच्या रांगेत उभे असताना दिसले.
अडीच महिन्यानंतर मुंबईत धावली पहिली लोकल
आजपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना लोकल प्रवास करता येणार नाही आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी चर्चगेटहून पहिली लोकल पहाटे ०५.४९ वाजता विरारला रवाना झाली. या पहाटेच्या लोकलमध्ये एकही सामान्य प्रवासी नव्हता. या लोकल महत्त्वाच्या स्थानकावर थांबवणार आहे.