मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इंदू मिलवरील जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. तसेच उद्धव ठाकरेंनी सर्वांच्या सहभागाने पायाभरणी होणार असल्याचे सांगितले आहे. यासंबंधी त्यांनी निर्देशही दिले आहेत. दरम्यान कोणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे.
कोणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये
“एमएमआरडीएने राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले. मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे, हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरवल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा, असे निर्देश दिले आहेत,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे. त्यामुळे कोणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
असे असेल बाबासाहेबांचे स्मारक
हे स्मारक ४५० फुटांचे, तर बाबासाहेबांचा पुतळा ३५० फुटांचा असणार आहे. यापूर्वी या पुतळ्याची उंची २५० फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. नव्या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा १०० फूट आणि पुतळा ३५० फूट अशी स्मारकाची एकूण उंची आता जमिनीपासून ४५० फूट इतकी होणार आहे. त्यामुळे पूर्वी ७०० कोटी रुपये होणारा खर्च आता १००० कोटी रुपयांवर जाणार आहे. आधी स्मारकासाठी ७०९ कोटी रुपये प्रस्तावित खर्च होता. आता सुधारित खर्च एक हजार ८९ कोटी ९५ लाख अपेक्षित असून, त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. स्मारकाचे काम शापूरजी पालनजी कंपनीमार्फत होणार आहे.
२०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदूमिल येथील आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते.