कल्याणपासून २० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मलंगगड किल्ल्यावरील बुरुज ढासळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किल्ल्यावरील रहिवाशांकडून वाळू काढण्यासाठी गडाला खणायला सुरुवात केली आहे. सध्या वाळूसाठी ठिकठिकाणी खोदल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. तसेच पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे.
मलंगगडावरील रहिवाशांचा नवीन व्यवसाय
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असणाऱ्या मलंगगडच्या किल्ल्यावर श्री मलंगनाथांचे स्थान आहे. या मलंगगडावरील श्री मलंगनाथांच्या समाधी मंदिराबाहेर असणाऱ्या तोफा आणि गडावरील बुरुज हे गडाचे मुख्य आकर्षण आहे. त्यामुळे या गडावर मोठ्या प्रमाणात हिंदू आणि मुस्लिम भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, मलंगगडावरील रहिवाश्यांकडून सध्या नवीन व्यवसाय सुरु आहे. रहिवाशांनी किल्ल्याला जागोजागी भगदाड पाडले असून त्यामधून येणाऱ्या मातीला पाण्यात धुतली जाते आणि मातीला पाण्यात धुतल्यानंतर येणाऱ्या रेतीला बाजारभावापेक्षा अधिक दरात विकले जात आहे, असा रहिवाश्यांनी नवीन धंदा सुरु केला आहे. मात्र, दिवसेंदिवस या गडावरील होणाऱ्या वाळूचोरीला आळा बसला नाही, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेकदा स्थानिकांनी तक्रारी केल्या असून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण होत आहे.
मलंगगडावरील मोठ्या प्रमाणात जागा वन विभागाच्या अंतर्गत आहेत. मात्र, या जागेवर मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु असल्याने सध्या (वाळू) रेतीला मोठी मागणी आहे. मात्र, ही काढलेली वाळू आपल्याच जीवावर उठणार असल्याचा स्थानिकांना विसर पडत आहे.
हेही वाचा – जळगावमध्ये वाळू माफियांवर कारवाई