मुंबईनंतर कल्याणपर्यंत मेट्रो जाळ्याचा विस्तार करण्यासाठी कल्याण-भिवंडी आणि कल्याण-तळोजा या दोन मेट्रो मार्गिकांच्या कामाची लवकरच सुरुवात होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता ही कामं अजून लांबणार आसल्याचं स्पष्ट झालं आहे. या दोन्ही मार्गांच्या बांधकामांमुळे या भागातली मोठ्या प्रमाणावर बांधकामं पाडावी लागणार होती. त्यासंदर्भात अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. भिवंडीतील वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरलेला धामणकर नाका उड्डाणपूल देखील मेट्रोसाठी पाडावा लागणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. या पार्श्वभूमीवर या मेट्रो मार्गासाठी पर्यायी मार्गांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या बैठकीत शिंदेंनी हे आदेश दिले. त्यामुळे कल्याणकरांची मेट्रोसाठीची प्रतिक्षा अजूनच लांबणार आहे.
अपूर्ण बांधकामांच्या इमारतींवरही संकट!
या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी या मार्गाच्या डिझाईनसंदर्भात विकासकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवल्या होत्या. प्राधिकरणाच्या सर्वेक्षणानुसार या मार्गासाठी कल्याणमधील अनेक बांधकामे पाडावी लागणार होती. ज्या इमारतींचं बांधकाम अदयाप पूर्णदेखील झालेलं नाही, अशी बांधकामं देखील पाडावी लागणार आहेत. शिवाय. भिवंडीच्या सरकारी रुग्णालय, भिवंडी महानगर पालिका, भिवंडी एसटी थांबा, न्यायालय या परिसरातून जाणारा महत्त्वपूर्ण धामणकर नाका उड्डाणपूलदेखील पाडावा लागणार होता. या पार्श्वभूमीवर आलेल्या तक्रारींचा विचार करता या मार्गांसाठी नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.