मागच्या तीन आठवड्यांपासून विविध कारणांमुळे मध्य रेल्वेच्या मार्गांवर लोकल वाहतुकीत अडथळे येत असून त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होण्यासोबतच त्यांना लेटमार्कमुळे पगारकपातीलाही सामोरे जावे लागत आहे. या समस्येसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रवाशांच्या बाजूने धावून आली आहे.
मध्य रेल्वेच्या मार्गावरून लोकल गाड्या गेल्या काही दिवसांपासून वारंवार उशिराने धावत आहेत. याचा परिणाम कल्याण डोंबिवलीतील प्रवाशांना होत असून कर्जत–कसारा मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. चाकरमान्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास लेट मार्क होत असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या मासिक पगारावर होऊन आणखी नवीन समस्या निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने अशा वेळी डोंबिवली आणि कल्याण स्थानकावरून विशेष लोकल सोडाव्यात व त्याचे नियोजन करावे अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
मनसेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी डोंबिवली रेल्वे स्टेशन महाव्यवस्थापकांची भेट घेतली. मनसेच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, रेल्वे स्टेशन पुलावर ये–जा करणाऱ्या डोंबिवलीकरांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या तिकीट तपासणीसांच्या धाडी त्वरीत थांबवाव्यात. कल्याण दिशेकडील पुलाच्या दुरूस्तीचे रखडलेले काम त्वरीत सुरू करून पूल वापरासाठी लवकरात–लवकर सुरू करून प्रवाशांना होणारा त्रासातून मुक्तता करावी.