गेल्या काही दिवसांपासून कोरोना आणि उकाड्यापासून नागरिक हैराण झाले आहेत. पण या उन्हापासून नागरिकांना लवकरचं दिलासा मिळणार आहे. विशेषत: मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये गेल्या २४ तासांत हलक्या पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांना काहीसा गारवा अनुभवता आला. या हलक्या पावसामुळे मुंबईसह , ठाणे, नवी मुंबई, पालघर, कल्याण डोंबिवली, टिटवाळा परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले असून पुढील २४ तासांतही या भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही भागांत निरभ्र आकाश आणि त्यानंतर अंशत: किंवा सामान्यत: ढगाळ स्थिती राहील, असा अंदाज आहे. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका कमी होऊन उकाड्यात घट झाली आहे. त्याचा परिणाम कमाल तापमानावर झाला आहे.
गेल्या 24 तासात, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर परीसरात हलक्या पावसाच्या सरी☔ पडल्या.
ढगाळ आकाश ☁☁व हलक्या पावसाच्या सरीची आजही शक्यता.🌦 pic.twitter.com/0xTk7turcL— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 31, 2021
२४ तासांत बरसतील हलक्या पावसाच्या सरी
हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसरात हलक्या पावसाच्या सरी पडल्या असून या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून आजही हलक्या पावसाच्या सरीची बरसण्याची शक्यता आहे.
पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बाष्प जमा झाले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच दोन जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणासह अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी आता शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत.