राज्यातील शाळा सोमवारपासून पुन्हा सुरु करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यानंतर मुंबईतही सोमवारपासून म्हणजे २४ जानेवारीपासून शाळा सुरु होणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कोरोनासंबंधीत एसओपीचे पालन करुन मुंबईतील शाळा सुरु होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेय.
शाळा सुरु करण्यासंदर्भातील राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर मुंबई पालिका स्थानिक स्तरावर पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा २४ जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे.
In line with the State Govt’s decision to let District Admins take a call on school reopening, Mumbai’s schools from pre- primary to 12th std will open with Covid SoPs from Monday, 24th.
Keep the mask, and stay safe, while we can keep our learning going on.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 20, 2022
मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले की, शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला कौल देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानुसार, मुंबईतील पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंच्या सर्व शाळा सोमवार २४ जानेवारीपासून कोरोनासंबंधीत नियमांचे पालन करुन सुरु होतील.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र संसर्गाचे प्रमाण सौम्य असल्याने आणि रुग्णसंख्या नियंत्रणात राहत असल्याने राज्य सरकारने आत पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरु करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील बोलताना म्हटले की, “सर्वच स्तरांतून शाळा सुरु करण्याच्या मागणी सर्वच स्थानिक स्तरावरून होत होती. दरम्यान आजच्या बैठकीत सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील सोमवारपासून म्हणजेच, 24 जानेवारीपासून शाळा सुरु परवानगी दिलीय. त्यामुळे कोरोनासंदर्भातील सर्व नियम पाळून शाळा सुरु होतील.मात्र पालकांची समंती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.