घरमुंबईनायगाव प्रसूतिगृहाचे 'त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर प्रसूतिगृह' असे केले नामकरण

नायगाव प्रसूतिगृहाचे ‘त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर प्रसूतिगृह’ असे केले नामकरण

Subscribe

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील श्रेष्ठ-कनिष्ठ भेदाभेद नष्ट करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांचा हाच सिद्धांत पुढे नेऊन आम्ही सामाजिक विकास साधणार आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. तसेच, कोकणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळी भेट देणारे रामनाथ कोविंद हे पहिले राष्ट्रपती आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

नायगाव येथील प्रसूतिगृहाचे ‘त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर प्रसूतिगृह’ असे नामकरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर, आनंदराज आंबेडकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, स्थानिक नगरसेविका उर्मिला पांचाळ, नगरसेविका तथा माजी महापौर श्रद्धा जाधव, नगरसेविका सुप्रिया मोरे, नगरसेवक सचिन पडवळ, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, उपायुक्त संजय कुऱ्हाडे, डॉ. संगीता हसनाळे, उपायुक्त चंदा जाधव, देवीदास क्षीरसागर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता (प्रभारी) डॉ. संगीता रावत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजावर अनंत उपकार – महापौर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान उपलब्ध करून दिले. त्यांनी समाजावर अनंत उपकार केले आहेत. जगात डॉ. बाबासाहेबांच्या कामांची उल्लेखनीय नोंद आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केले. डॉ. आंबेडकरांमुळे महिलांना प्रसूती रजा मंजूर झाली. ग्रंथ कमी पडतील इतके उत्तुंग काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. मला सोन्याचे दागिने नको, कुंकू हेच माझे दागिने आहे, असा अमूल्य विचार माता रमाई यांनी मांडला, असे महापौरांनी सांगितले.

तरच डॉ. आंबेडकरांना अपेक्षित भारत घडेल – खा. राहुल शेवाळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हा लोकप्रतिनिधींना सन्मान मिळाला आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम केले तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला स्वप्नातील भारत आपण घडवू शकतो. महापालिकेने नामकरणाचा कार्यक्रम घेऊन माता रमाई यांचा शासकीय सन्मान केला आहे. त्यागमूर्ती माता रमाई यांचे अमूल्य योगदान आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी केले.

- Advertisement -

नऊ मजली अत्याधुनिक प्रसूतिगृह बनवावे – आ. कालिदास कोळंबकर

नायगाव प्रसूतिगृहाच्या नामकरणाला प्रथम मी पाठिंबा दिला होता. तसेच, चैत्यभूमी येथे भीमज्योत बसविण्याची कार्यवाही पूर्ण केली. हे प्रसूतिगृह कमीत कमी नऊ मजली होऊन ते अत्याधुनिक झाले पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी यावेळी केली.

माता रमाई दैवत – यशवंत जाधव

माता रमाई हे आपले दैवत आहे. आजचा कार्यक्रम हा अभूतपूर्व असून नामकरण समारंभास सहकार्य करण्यासाठी उपस्थित सर्वांचा यामध्ये वाटा आहे. आम्हाला अपेक्षित असलेले प्रसूतिगृह आधुनिकीकरणासह लवकरच उभे राहील, असे प्रतिपादन पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी यावेळी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांनाही न्याय दिला – आनंदराज आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुरुषांच्या बरोबरीने महिलांना न्याय दिला आहे. त्यांचा यथोचित कार्यक्रम आज येथे होत आहे. आजच्या नामकरण समारंभामुळे चांगला संदेश जनमानसात पोहोचला आहे, असे प्रतिपादन डॉ. आंबेडकरांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी केले.


हेही वाचा – नव्या वर्षात मध्य रेल्वेवर ३६ नवीन लोकल फेऱ्या, पंतप्रधानांच्या हस्ते होणार नव्या मार्गिकेचे उद्घाटन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -