नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामस्वामी एन. यांचा जनसंवाद शहरातील प्रत्येक भागात सुरू आहे. नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविषयी असलेल्या तक्रारी तसेच विभागात असलेल्या सोयी सुविधा थेट आयुक्तांपर्यंत कळाव्यात यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. पाहिल्या दिवसापासूनच या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. मात्र नागरिकांचा हा कार्यक्रम नगरसेवकांनी हायजॅक केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
तुकाराम मुंढेंचा कित्ता गिरवला
माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या काळात वॉक विथ कमिशनर हा उपक्रम सुरू केला होता. त्यास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत होता. मात्र यात मुंढे यांनी नगरसेवकांना कोणतेही स्थान दिले नव्हते. त्यामुळे निवळ आयुक्त आणि नागरिक असा संवाद रंग होता. त्याचाच कित्ता गिरवत सध्याचे आयुक्त डॉ. रामस्वामी एन. यांनी प्रत्येक विभागात नागरिकांशी जनसंवाद सुरू केले आहेत. या उपक्रमाचे स्वागत करत नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्या विभागातील नगरसेवक देखील यात सामील होत आहेत. शांत स्वभावाचे असलेले आयुक्त नगरसेवकांना मान देऊन चर्चा करत असल्याने नागरिकांना मात्र ताटकळत बसावे लागत आहे.
नगरसेवक दररोज घेतात आयुक्तांची भेट
नगरसेवक हे दररोज विविध सोयी सुविधांसाठी आयुक्तांची भेट घेत असतात. आयुक्तांची भेट घेण्यासाठी नगरसेवकांना वेळेची कोणतीही अट वा बंधन नसल्याचे दिसून येते. मात्र सामान्य नागरिकांसाठी आयुक्तांच्या भेटीची वेळ ही ४ ते ५ अशी आहे. मात्र सामान्य नागरिकाला आपली नोकरी सॊडून आयुक्तांच्या भेटी घेणे शक्य होत नाही. त्यामुळे आयुक्तांनी स्वतःहून हा जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला आहे.
नगरसेवकांमुळे नागरिक नाराज
जनसंवाद या कार्यक्रमामुळे नागरिकांना आयुक्तांसामोर परिसरातील काही अडचणी आणि काही संधी उपलब्ध होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मात्र या ठिकाणी देखील नगरसेवकच पुढे येत असल्याने नागरिकांमध्ये माराजी पसरली आहे. आयुक्तांच्या भेटीला येणारे नगरसेवक टोक न घेता आयुक्तांना आपल्या कार्यकर्त्यांसोबत भेटत असतात. त्यामुळे या भेटीत भरपूर वेळ वाया जात असल्याने नागरिकांना मात्र न्याय मिळत नाही. त्यामुळे नागरिक निराश होऊ लागले आहेत. जनसंवाद नागरिकांसाठी की नगरसेवकांसाठी असा प्रश्न खुद्द नागरिकच विचारू लागले आहेत. त्यामुळे आयुक्त यापुढील दौऱ्यात तरी फक्त नागरिकांसाठी वेळ देणार एक असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.